Virat Kohli Twitter : कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ठरला सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू
पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Twitter : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण आता त्यानेने सोशल मीडियावरही विक्रम रचण्याची कामगिरी केली आहे. विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे ज्याचे ट्विटरवर 50 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स बनले आहेत. ट्विटरवर इतके फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू जगात सध्या तरी नाही. त्याचबरोबर विराटचे ट्विटर खाते हे भारतातील तिसरे सर्वात मोठे खाते ठरले आहे. एवढेच नाही तर विराटचे इंस्टाग्रामवर 211 मिलियन फॉलोअर्स आहेत. माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या बाबतीत विराटच्या खूप मागे आहेत.
विराट कोहली पेक्षा जास्त फॉलोअर्स हे भारताच्या पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे आहेत. पीएमओच्या ट्विटर खात्याचे फॉलोअर्स 50.5 मिलियनहून अधिक आहेत. तर भारताचे पंतप्रधान हे देशातील पहिले ट्विटर खातेधारक आहेत, ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या 82.3 मिलियन पेक्षा जास्त आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 37.8 दशलक्ष आहे. (Virat Kohli Twitter)
क्रीडा जगतातील स्टार खेळाडू…
क्रीडा जगताबद्दल बोलायचे तर, क्रिस्टियानो रोनाल्डो या प्रकरणात सर्वाधिक फॉलोअर्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 450 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यानंतर लिओनेल मेस्सीचे 333 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दरम्यान, विराट कोहलीही खूप चर्चेत आहे कारण काही दिवसांपूर्वीच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले होते. एकूण क्रिकेट करिअरमधील हे याचे 71 वे शतक ठरले. या शतकाबरोबरच विराटचा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या खास खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीला गवसला फॉर्म
आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी साकारून टीककारांना सडेतोड उत्तर दिले. त्याने तब्बल 1020 दिवसांनी शतक झळकावले. 2019 मध्ये, टीम इंडियाने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतात पहिली डे नाईट कसोटी खेळली तेव्हा त्याने शतक झळकावले. हा सामना 22 नोव्हेंबर 2019 पासून सुरू झाला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबरला विराटने शतक फटकावले. त्यानंतर तब्बल अडीच वर्षे त्याच्या बॅटमधून शतक आले नाही. अनेकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. काहींनी तर त्याला संघातून बाहेर बसवा असे म्हटले. 70 शतकं झळकावणाऱ्या विराटला पहिल्यांदाच पुढचे शतक झळकावण्यासाठी इतकी प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा 1019 दिवसांची ठरली आणि त्याने 1020 व्या दिवशी शतक पूर्ण केले. आता विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा धावा काढायला सुरुवात केली आहे. त्याचा फॉर्म 2022 च्या T20 वर्ल्ड कपपर्यंत कायम राहील अशी आशा आहे आणि . भारतीय संघ आणखी एक वर्ल्ड कप आपल्या नावावर करेल अशी अपेक्षा आहे. (Virat Kohli Twitter)