आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी वाईट बातमी, ‘हा’ गोलंदाज स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता | पुढारी

आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी वाईट बातमी, ‘हा’ गोलंदाज स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आज श्रीलंकेवर मात करणे आवश्यक आहे. दरम्यान, सामन्याच्या अवघ्या काही तास आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. आवेश खान (avesh khan) आजारपणामुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. आवेश पाच दिवसांपासून हॉटेलमधून बाहेर पडलेला नाही.

श्रीलंकेशिवाय भारताला आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. जर टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे फायनलचे तिकीट नक्कीच पक्के आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार आवेश खान स्पर्धेतून बाहेर पडल्यास त्याच्या जागी कुलदीप सेन किंवा दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते, जेणेकरून वेगवान गोलंदाजी मजबूत करता येईल. (avesh khan)

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्हायरल फिव्हरशी झुंज देत असलेल्या आवेश खानची प्रकृती सुधारत आहे, परंतु तो श्रीलंकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. जर भारतीय संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर संघ व्यवस्थापन कोणतीही जोखीम पत्करणार नाही आणि त्याला वगळून संघात इतर कोणत्याही गोलंदाजाला ठेवू शकेल. (avesh khan)

खरं तर, टीम फिजिओने सल्ला दिला आहे की जर आवेश खेळला तर त्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याला तापामुळे अशक्तपणा जाणवत आहे. अशा परिस्थितीत अचानक सामन्यात प्रवेश केल्याने दुखापतीचा धोका वाढू शकतो. त्याचवेळी संघ व्यवस्थापनातील काहींना आवेशने मैदानात उतरावे असे वाटत आहे. मात्र, मंगळवारी उशिरा होणाऱ्या सामन्यानंतरच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.

Back to top button