

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेतील दुसरा सामना कटकच्या बाराबाती स्टेडियमवर खेळवला जाईल. रविवारी (१२ जून) होणाऱ्या या सामन्याच्या तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत उभारलेल्या महिलांमध्ये यावेळी तुफान हाणामारी झाली. त्यामुळे तिकीट विक्री दरम्यान मोठा गोंधळ पहायला मिळाला. गोंधळ घालत असलेल्या क्रिकेट प्रेमींना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (IND vs SA 2nd T20)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला तिकीट खरेदी करण्यासाठी केलेल्या रांगेतून बाहेर आल्या यातूनचं मोठा गोंधळ झाला. या व्हिडीओमध्ये काही महिला हाणामारी करताना दिसत आहेत. काही लोकांना तिकीट मिळवण्यासाठी रांगेतून बाहेर काढण्यात आले. त्यातूनचं या हाणामारीला सुरुवात झाली. बाराबती स्टेडियममध्ये ४०,००० लोक तिकीट खरेदी करण्यासाठी आले होते. पण फक्त १२,००० तिकीटांची विक्री याठिकाणी होणार होती. बाराबाती स्टेडियममध्ये ४५ हजार लोकांची आसनक्षमता आहे, पण भरपूर तिकीटांची यापुर्वीचं विक्री करण्यात आली होती.(IND vs SA 2nd T20)
कटकच्या बाराबाती स्टेडियमवर २०१९ नंतर हा सामना खेळवला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या स्टेडियमवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला नव्हता, त्यामुळे प्रक्षेक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (IND vs SA 2nd T20)
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही या सामन्याचे तिकीट खरेदी केले आहे. ओडिसा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष पंकज लोचन यांनी नवीन पटकनायक यांच्या तिकीटाची खरेदी केली. नवीन पटनायक हे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा टी-२० सामना पाहण्यासाठी येणार आहेत. (IND vs SA 2nd T20)
भारत वि. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील दुसरा सामना कटकच्या बाराबाती स्टेडियमवर खेळवला जात आहे. या स्टेडियमवर भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली आहे. यापुर्वी दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली झालेल्या सामन्यात भारताचा मोठा पराभव केला होता. (IND vs SA 2nd T20)