विराट कोहली याने मानले चाहत्यांचे आभार | पुढारी

विराट कोहली याने मानले चाहत्यांचे आभार

मुंबई ; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा 8 वा संघ ठरला आहे. आरसीबीने या हंगामात एकूण 16 सामने खेळले. त्यापैकी 9 जिंकले आणि 7 सामने हरले. राजस्थान विरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर विराट कोहली याने चाहत्यांसाठी भावुक मेसेज केला आहे. आमचे चाहते हे संघातील बाराव्या खेळाडूइतकेच महत्त्वाचे आहेत, असे त्याने म्हटले आहे. त्याची ती पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आयपीएल स्पर्धेतीतून आरसीबी बाहेर पडताच विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासोबत त्याने भावुक मेसेजदेखील केला आहे. चाहत्यांमुळे स्पर्धा खास ठरत असते, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

कधी कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही, आमचे चाहते हे संघाचा 12 वा खेळाडूप्रमाणे आहेत. तुम्ही अप्रतिम आहात, आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. तुम्ही क्रिकेटला विशेष बनवता. शिकणे कधीही थांबत नाही, अशा आशयाची पोस्ट 33 वर्षीय विराटने केली आहे. तसेच, आयपीएल 2022 च्या मोहिमेतील फोटोदेखील त्याने पोस्ट केले आहेत.

यंदाच्या हंगामात कोहलीने 15 सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 334 धावा केल्या आहेत. त्याने केवळ 2 अर्धशतके झळकावली आहेत. तर तीनवेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला आहे. विराटने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 222 सामने खेळले आहेत. यामध्ये 5 शतके तर 44 अर्धशतके ठोकली आहेत.

कोहलीने ब्रेक घ्यावा : ब्रेट ली

नवी दिल्‍ली : विराट कोहलीने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी, कोहलीला मनाने तंदुरुस्त राहायचे असेल तर त्याला विश्रांतीची गरज आहे. विश्रांतीनंतर तो दमदार कामगिरी करू शकेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने म्हटले आहे. तसेच विराटने पुढेही चांगली कामगिरी करावी, अशीच माझी इच्छा असल्याचेही ब्रेट ली म्हणाला.

राजस्थान रॉयल्सने 7 विकेटस्ने पराभव केल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर ब्रेट लीने विराटबद्दल मत व्यक्‍त केले आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षांत एकही शतक झळकावू शकलेला नाही. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

Back to top button