वृद्धिमान साहा बंगाल सोडण्याच्या तयारीत? | पुढारी

वृद्धिमान साहा बंगाल सोडण्याच्या तयारीत?

कोलकाता ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धा संपल्यानंतर होणार्‍या रणजी करंडक बाद फेरीतील सामन्यांपूर्वी त्याने बंगालचा संघ सोडण्याचे संकेत दिले आहेत. साहाने बुधवारी (25 मे) रात्री संघाचा अधिकृत व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप सोडला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा वृद्धिमान साहा वादात सापडला होता, तेव्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) सहसचिव देवव्रत दास यांनी पत्रकारांसमोर साहाच्या संघाप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाने रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅबचे सहसचिव देवव्रत दास नाराज झाले होते. त्यांनी साहाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

भारतीय संघात नसताना साहाने रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळण्यास काहीच हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जर तो नकार देत आहे तर बंगालप्रती त्याची कोणतीही जबाबदारी नाही, असे आपण गृहीत धरले पाहिजे का? असेही दास म्हणाले होते.

वृद्धिमानने बंगालचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप सोडल्यानंतर त्याच्या पत्नीने याप्रकरणी वक्तव्य केले आहे. याबाबत साहाची पत्नी रोमी म्हणाली की, ‘वृद्धिमानच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तो फार दुखावला आहे. 6 जूनपासून झारखंडविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी बंगालचा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा त्यात त्याच्या नावाचा समावेश नव्हता. म्हणून त्याने ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’

साहा गेल्या 15 वर्षांपासून बंगालच्या संघासोबत आहे. त्याने बंगालसाठी 122 प्रथम श्रेणी आणि 102 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. मात्र, आता हे संबंध संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

Back to top button