IPL 2022 : सामना मुंबई-दिल्लीचा, पण घोषणाबाजी RCB च्या नावाची! | पुढारी

IPL 2022 : सामना मुंबई-दिल्लीचा, पण घोषणाबाजी RCB च्या नावाची!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 चा 69 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना 5 गडी राखून जिंकला. हा सामना दिल्ली आणि मुंबई यांच्यात खेळला जात होता पण या सामन्यादरम्यान आरसीबीचे नशीब पणाला लागले होते. कारण मुंबई इंडियन्सच्या विजयावर आरसीबीचे प्लेऑफमध्ये जाणे अवलंबून होते. तर दुसरीकडे सामना गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आपोआप लीगमधून बाहेर पडणार होती. आणि झालेही तसेच. मुंबईने दिल्लीवर मात करत आरसीबीच्या प्लेऑफमधील स्थानावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे काल झालेल्या रोमांचक सामन्यात प्रेक्षक आरसीबी-आरसीबीचा नारा देत असल्याचेही पहायला मिळाले.

दिल्ली आणि मुंबई यांच्यात सामना सुरू होता. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक आरसीबीला पाठिंबा दर्शवत आपल्या आवडत्या संघाला प्लेऑफमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी ते आरसीबी… आरसीबीच्या जोरदार घोषणा देत होते. काही प्रेक्षक आरसीबीचा ड्रेस घालून मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतानाही दिसत होते, त्यामुळे आता चर्चा अशीही आहे की, आरसीबीच्या चाहत्यांच्या जोरावरच मुंबईला मुंबई इंडियन्सला सामना जिंकण्यात यश आले. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीचा संघ ८व्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

आयपीएल 2022 मध्ये, RCB ने फॅफ डु प्लेसिसकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. 14 सामन्यांत 8 सामने जिंकण्यात आरसीबी संघाला यश आले आहे. तर 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबी चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. जर दिल्ली कॅपिटल्स मुंबईविरुद्धचा सामना जिंकण्यात यशस्वी झाला असता तर आरसीबी पाचव्या क्रमांकावर गेला असता आणि दिल्ली कॅपिटल्स चौथ्या क्रमांकावर गेली असती, पण तसे झाले नाही.

आता पुढे नॉकआऊट सामन्यात आरसीबी संघ कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे. आरसीबीसाठी आनंदाची बातमी म्हणजे संघाचा दिग्गज सलामीवीर विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. कोहलीने फॉर्ममध्ये पुनरागमन केल्याने संघाला मोठा फायदा होताना दिसत आहे.

Back to top button