Suryakumar Yadav : विराट कोहलीला खुन्नस देण्यावरून सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा, म्हणाला.. | पुढारी

Suryakumar Yadav : विराट कोहलीला खुन्नस देण्यावरून सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा, म्हणाला..

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामात मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबईने या मोसमात आतापर्यंत सहा सामने गमावले आहेत. संघ अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. मुंबईच्या खराब कामगिरीत आशेचा किरण आहे मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav). दुखापतीतून पुनरागमन केलेल्या सूर्याने या स्पर्धेत काही चमकदार खेळी खेळल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) 2020 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) तत्कालीन कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) स्लेजिंग केल्यानंतर सूर्यकुमारने त्याच्याकडे रोखून पाहत खुन्नस दिली होती. हा क्षण त्यावेळी खूप चर्चिला गेला होता. अद्यापही त्याबाबत अनेकदा बोलले जाते. दरम्यान गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शोमध्ये सूर्यकुमार यादवने विराटशी झालेल्या वादावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सुर्या (suryakumar yadav) म्हणाला की, विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. काही वेळा त्याची विरोधी संघातील खेळाडूंशी बाचाबाचीही होते. अशीच एक घटना आयपीएल 2020 दरम्यान घडली जेव्हा कोहलीचे मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवशी भांडण झाले. मुंबईच्या या खेळाडूने तब्बल दोन वर्षांनी या घटनेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात मुंबई आणि बंगळुरू यांच्यात अबुधाबीमध्ये 48 वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने (RCB) मुंबईसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सूर्यकुमारच्या शानदार खेळीच्या जोरावर एमआयने 5 गडी राखून हे आव्हान पार केले. सूर्यकुमारने या काळात आरसीबीविरुद्ध 43 चेंडूत 79 धावांची वादळी खेळी खेळली.

‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये कोहलीसोबत (Virat Kohli) घडलेल्या घटनेबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “ही विराट कोहलीची शैली आहे. मैदानावरील त्याची एनर्जी लेव्हल नेहमीच वेगळी असते. तो सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता, त्यामुळेच विराटची मॅचमधली स्लेजिंग वेगळ्याच पातळीवर पोहचली होती. मी स्वतःवर लक्ष केंद्रित करत होतो. मी स्वतःला उद्देशून म्हणत होतो की, तू फोकस गमावू शकत नाही आणि कोणत्याही किंमतीत सामना जिंकायचा आहे. दरम्यान, मी फटकावलेला एक चेंडू विराटकडे गेला आणि त्याने आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी मी पण त्याला टशन दिली. यानंतर वाद पेटला.’

31 वर्षीय सुर्यकुमार पुढे म्हणाला की, ‘मला आठवते की मी त्या वेळी च्युइंगम चघळत होतो आणि तो (कोहली) माझ्या दिशेने येत आहे हे पाहून माझे हृदय धडधडत होते. तो काही बोलत नव्हता, मी काही बोलत नव्हतो. त्याचवेळी मी मनातल्या मनात म्हणत स्वत:ला बजावून सांगत होतो की, काहीही झाले तरी एक शब्दही बोलू नकोस. ही 10 सेकंदांची बाब आहे. त्यानंतर नवीन षटक सुरू होईल. ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. परिस्थिती निघून गेली आणि मग मी त्याला सामन्यानंतरच पाहिले.’

सूर्यकुमार यादवसाठी आयपीएल 2020 छान ठरले. त्याने चार अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्ससाठी 480 धावा केल्या. मुंबईने तेव्हा विक्रमी 5 वे आयपीएल विजेतेपदही पटकावले होते.

Back to top button