पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आयपीएलचा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी महाराष्ट्र एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एटीएसने गुरुवारी काही दहशतवाद्यांना पकडले, ज्यांनी चौकशीदरम्यान उघड केले की त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, खेळाडूंचे हॉटेल आणि दोन ठिकाणांना जोडणारा रस्त्याची रेखी केली आहे. (IPL 2022 Terrorist Attack)
गेल्या आयपीएलच्या (IPL 2021) अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. शनिवारी हे दोन्ही संघ स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने गेल्या वेळी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या केकेआरला यंदा श्रेयस अय्यरच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ मागच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. (IPL 2022 Terrorist Attack)
दरम्यान, आयपीएल २०२२ च्या पहिल्याच सामन्यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. हा धोका लक्षात घेऊन आता स्टेडियमभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वृत्तानुसार, २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्यूआरटी, स्पेशल फोर्स आणि एसपीआरएफ संपूर्ण स्पर्धेत तैनात केले जातील. (IPL 2022 Terrorist Attack)
यावेळी आयपीएलमध्ये ७० साखळी सामने होणार असून हे सर्व सामने मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामध्ये मुंबईचे वानखेडे आणि ब्रेबॉर्न, नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम यांचा समावेश आहे. (IPL 2022 Terrorist Attack)