

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : अहमदाबादमध्ये पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. भारताचा हा 1,000 वा वन-डे सामना होता. या ऐतिहासिक विजयासह रोहितने आपल्या कर्णधारपदाच्या युगाला प्रारंभ केला. इतका मोठा विजय मिळवल्यानंतरही रोहित शर्मा समाधानी नव्हता. वेस्ट इंडीजच्या तळाच्या फळीने आम्हाला दमवले आणि आमची मधली फळी ढेपाळली, या गोष्टी विजयाच्या आनंदात दुर्लक्षून चालणार नाहीत, असे रोहित म्हणाला.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने आपल्या खेळाडूंना नावीन्यपूर्ण काम करण्याचे आवाहन केले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, एक संघ म्हणून आम्हाला उत्तम व्हायचे आहे. संघाला जे हवे आहे ते साध्य करणे हे अंतिम ध्येय आहे. जर संघाला आमच्याकडून काही वेगळे करायचे असेल, तर आम्हाला ते करावे लागेल. आपण खूप बदलले पाहिजे, असे समजू नका. मी खेळाडूंना स्वतःला आव्हान देत राहण्यास सांगत आहे. त्यांनी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून गरज पडेल तेव्हा खेळाडू त्यासाठी तयार होतील.
रोहित म्हणाला, माझा 'परफेक्ट' खेळावर विश्वास नाही. तुम्ही 'परिपूर्ण' होऊ शकत नाही; पण सगळ्यांनी छान काम केले. आम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. मला याचा खूप आनंद झाला आहे. फलंदाजी करताना, आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना जास्त विकेट गमावू नये, ही पहिली गोष्ट आहे आणि गोलंदाजी करताना आम्ही त्यांच्या खालच्या ऑर्डरवर अधिक दबाव आणू शकलो असतो. मला त्यांच्याकडून श्रेय काढून घ्यायचे नाही. आम्ही सुरुवातीला आणि नंतर शेवटी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती चांगली होती.
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 176 धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने 6 गडी राखून विजय मिळवला. एकेकाळी भारत मजबूत स्थितीत होता; पण कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली, ईशान किशन, ऋषभ पंत पटापट तंबूत परतले.