रत्नागिरी : 'ऑल द बेस्ट', 'श्रीमंत दामोदर पंत', 'सही रे सही', 'पुन्हा सही रे सही' आदी अनेक एकापेक्षा एक नाटकांसह अनेक चित्रपटांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीत नाटकासाठी पुन्हा पाऊल ठेवणार नाही, असं प्रेक्षकांपुढे हात जोडत जाहीरपणे सांगितलं आणि एका दिग्गज कलावंताच्या रत्नागिरीवरील या उघड नाराजीमुळे रत्नागिरीवासीय रसिकांचं मनही खट्टू झालं. हा प्रकार शनिवारी रात्री येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात 'तू तू मी मी' नाटकाच्या प्रयोग सादरीकरणावेळी घडला. नाट्यगृहात ए. सी. आणि साऊंड सिस्टीम नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाले. ए. सी. नसल्याने काय होतं, हे आमच्या भूमिकेतून पाहा, अशी कळकळीची विनंती भरत जाधव यांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय तुम्ही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता, असा सवाल करीत रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असे भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.