

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अष्टपैलू भुमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विक्रांत मॅसीने अभिनय क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांने असा निर्णय घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्याने सोशल मीडियावर अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने विविध वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये दमदार भुमिका केल्या आहेत. नुकताच त्याचा 'साबरमती रिपोर्ट्स' हा चित्रपट रिलिज झाला आहे. यामध्ये त्याचा अभिनयाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. याचबरोबर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
विक्रांतने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- हॅलो, गेली काही वर्षे खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अद्भुत पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. पण जसजसा मी पुढे जात आहे तसतसे मला हे समजले आहे की, माझ्यासाठी स्वतःला एकत्र खेचून घरी परतण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा... आणि अभिनेता म्हणूनही. विक्रांतने पुढे लिहिले - येत्या 2025 मध्ये, योग्य वेळ येईपर्यंत आम्ही एकमेकांना शेवटच्या वेळी भेटू. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. सर्व काही आणि दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन.
विक्रांत मॅसीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने छोट्या पडद्यापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्याने धरम वीर, बालिका वधू, कुबूल है यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. त्याने टीव्हीवर खूप नाव कमावले आणि त्याच्या चाहत्यांची मनेही जिंकली. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला.
विक्रांत 2013 साली 'लुटेरा' चित्रपटात दिसला होता. त्यानंतर 'दिल धडकने दो', 'छपाक' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली. विक्रांतने पुन्हा एकदा मागे वळून पाहावे अशा पद्धतीने यशाची शिडी चढली. एकापाठोपाठ एक उत्तम चित्रपट करत तो रसिकांची मने जिंकत राहिला. विक्रांतने अनेक चित्रपट केले, पण '12वी फेल' हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटात विक्रांतने ज्या साधेपणाने आणि सच्चेपणाने आयपीएस मनोज कुमार यांची कथा मांडली आणि त्यांची व्यक्तिरेखा साकारली त्यामुळे प्रत्येकाचे मन जिंकले. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले.
विक्रांतचा नुकताच प्रदर्शित झालेला 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपटही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला होता. देशातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक असलेल्या गोध्रा घटनेवर आधारित या चित्रपटाचे राजकीय वर्तुळात खूप कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. विक्रांतने चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे, ज्याला या संपूर्ण घटनेचे सत्य समोर आणायचे आहे. विक्रांत मॅसीचे तीन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यार जिगरी, टीएमई आणि आँखों की गुस्ताखियांमध्ये तो दिसणार आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे.
विक्रांतने आपल्या अभिनय कार्यकिर्दीमध्ये अनेक दमदार अभिनय केले. त्यामध्ये छपाक, हाफ गर्लफ्रेंड, गिन्नी वेड्स सनी, हसीन दिलरूबा, गैसलाइट, लव हॉस्टल, 12th फेल, सेक्टर 36 अशा अनेक चित्रपटांमधून विक्रांतने अभिनेता म्हणून खूप नाव कमावले. मिर्झापूर या वेबसिरीजने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला एक नवीन उडान दिले.
विक्रांत मॅसीच्या आगामी चित्रपटांबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु असे मानले जाते की आंखों की गुस्ताखियां आणि झिरो से रीस्टार्ट हे त्याचे शेवटचे दोन चित्रपट असू शकतात. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.