

vijay thalapathy jan nayagan sc refuses intervention hc ordered to decide by 20 jan
पुढारी ऑनलाईन :
थलपती विजयच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाच्या रिलीजशी संबंधित वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) नकार दिला आहे. कोर्टाने चित्रपटाच्या निर्मात्यांना मद्रास उच्च न्यायालयात (हायकोर्ट) जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात 20 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचला दिले आहेत.
थलपती विजयच्या ‘जन नायकन’ चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी चित्रपटाच्या रिलीजवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. निर्मात्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता विजयच्या या चित्रपटाबाबत अंतिम निर्णय हायकोर्टच घेणार आहे.
निर्मात्यांकडून कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आला?
सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचला या प्रकरणात 20 जानेवारीपर्यंत निर्णय देण्यास सांगितले आहे. KVN प्रोडक्शन्सच्या वतीने सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी अपील करताना सांगितले की, हायकोर्टाने 20 जानेवारीपूर्वी या प्रकरणावर निर्णय घ्यावा. कारण चित्रपट अडकल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
निर्मात्यांच्या वतीने कोर्टात असेही सांगण्यात आले की, “आम्ही सर्व न्यायाधीशांना विनंती करतो की हा खटला एक-दोन दिवसांत निकाली काढावा. मी सर्व काही गमावले आहे. मी पूर्णपणे बर्बाद झालो आहे.”
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हायकोर्टाकडे लागले आहे. ‘जन नायकन’ हा साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार थलपती विजयचा शेवटचा चित्रपट आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा हा त्याचा अखेरचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. मात्र, चित्रपटाच्या सर्टिफिकेशनबाबत सुरू असलेला वाद इतका लांबेल, असे कुणालाही वाटले नव्हते.
सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. विजयचा हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. त्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाली होती. मात्र, रिलीजला उशीर झाल्यामुळे वितरकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालय यांच्यात अडकून विजयचा चित्रपट सध्या रखडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जन नायकन’च्या निर्मात्यांनाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चाहत्यांना आधी वाटत होते की, पोंगलपर्यंत काहीतरी तोडगा निघेल आणि सेन्सॉर बोर्डसोबतचा वाद संपेल. मात्र, तसे काहीही घडले नाही. ‘जन नायकन’ हा विजयचा पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल हेही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.