

taarak mehta ka ooltah chashmah tanmay vekaria bagha runed house in 700 rs financial crisis before gain popularity
पुढारी ऑनलाईन : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा दूरचित्रवाणीवरील अत्यंत लोकप्रिय शो आहे. या मालिकेने अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले. त्यापैकी एक म्हणजे तन्मय वेकारिया उर्फ ‘बाघा’. कांदिवली येथे जन्मलेल्या तन्मय यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. अभिनेता होण्यापूर्वी त्यांनी बेरोजगारी, आर्थिक तंगी आणि संघर्षाचा कठीण काळ अनुभवला. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितले.
तन्मय म्हणाले, “आमच्या घरी आई-वडील, माझा भाऊ मनवित आणि मी असे चौघे होतो. आज माझा भाऊ ऑस्ट्रेलियात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून स्थायिक झाला आहे. माझे वडील अरविंद वेकारिया हे गुजराती रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव आहेत. लहानपणापासून त्यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहून मला अभिनयाची प्रेरणा मिळाली.”
“1999 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर मी अभिनयाच्या संधी शोधू लागलो. अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोर्टफोलिओ दिला, ऑडिशन्स दिल्या, पण काहीच यश मिळाले नाही. हा काळ जवळपास दीड वर्ष चालला. पदवीधर असूनही माझ्याकडे कोणतेही उत्पन्न नव्हते.”
तन्मय पुढे सांगतात, “वडील वयस्कर होत आणि लहान भाऊ शिक्षण घेत होता. वडिलांचे रंगभूमीवरील उत्पन्न मर्यादित होते. त्यामुळे त्यांनी मला स्थिर नोकरी करण्याचा सल्ला दिला. कुटुंबाला आधार देण्यासाठी मी चुलत्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली.”
“माझा पहिला पगार फक्त 700 रुपये होता आणि त्यासोबत सेकंड क्लास रेल्वे पास मिळत होता. त्याचवेळी मी पार्ट-टाईम थिएटर करत होतो. मात्र, मी केलेली नाटके प्रेक्षकांना फारशी आवडली नाहीत. अनेक अपयशानंतर मी रंगभूमी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान आज ‘जेठालाल’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप जोशी एका नाटकाचे दिग्दर्शन करत होते. त्यांनी मला त्यात एक छोटी भूमिका दिली.”
“त्या वेळी माझे वय 30 वर्षे होते. मी विवाहित होतो आणि मला एक मुलगी होती. जबाबदाऱ्या खूप होत्या, पण उत्पन्न अत्यंत कमी होते. नोकरीतून फक्त 700 रुपये मिळत होते आणि पार्ट-टाईम कामातून थोडीफार कमाई होत होती. आई-वडील आणि मुलीचा सांभाळ करणे सोपे नव्हते. सुदैवाने त्या नाटकामुळे माझी दखल घेतली गेली. त्यानंतर मला दिशा वाकानीसोबत आणखी एक नाटक मिळाले आणि तेथून माझ्या अभिनय प्रवासाला खरी सुरुवात झाली.”
“मी गुजराती मालिकांमधून टीव्ही कारकिर्दीची सुरुवात केली. त्या काळात दिवसाला जास्तीत जास्त 1200 रुपये मिळत होते. नंतर असित कुमार मोदी आणि जेडी मजेठिया यांनी हिंदी मालिकांची निर्मिती सुरू केली. त्यांनी मला त्यांच्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका करण्याची संधी दिली. मी ‘बा बहू और बेबी’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये लहान भूमिका साकारल्या. तसेच राजन वाघधरे यांनीही मला ‘यश’ मालिकेत छोटा रोल दिला.”
तन्मय सांगतात, “टीव्हीवर मला पहिली मोठी ओळख ‘मणीबेन डॉट कॉम’ या मालिकेमुळे मिळाली. त्यात मी स्मृती इराणी यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. मात्र, ही मालिका संपल्यानंतर चार महिने माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. ना नवीन ऑफर मिळत होती, ना ऑडिशनसाठी फोन येत होते. मी खूप तणावात होतो आणि पुन्हा अकाउंटिंगची नोकरी करण्याचा विचार करू लागलो होतो.”
“अशाच काळात मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून फोन आला. ‘बाघा’ हे पात्र साकारताना मी खऱ्या आयुष्यातील एका व्यक्तीकडून प्रेरणा घेतली. त्याची उभी राहण्याची आणि वागण्याची पद्धत खूप वेगळी होती. त्याचे काही हावभाव मी या पात्रात समाविष्ट केले आणि ते असित मोदी व दिलीप जोशी यांना दाखवले.”
“त्यांना ते खूप मजेदार आणि वेगळे वाटले. माझा पहिला सीन पाहिल्यानंतरच त्यांनी सांगितले की हे पात्र मोठे हिट ठरेल आणि एक वेगळा मापदंड निर्माण करेल. त्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. सुरुवातीला फक्त एक छोटा कॅमिओ असलेली भूमिका पुढे कायमस्वरूपी झाली आणि ‘बाघा’ हे पात्र मालिकेतील सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाच्या पात्रांपैकी एक बनले.”