

Shilpa Shinde had made a false accusation of sexual harassment... but the subject was different; find out the real reason.
पुढारी ऑनलाईन : टीव्ही विश्वात 'अंगुरी भाभी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत स्थान मिळवले आहे. नुकत्याच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये शिल्पा यांनी एक धक्कादायक खुलासा केला, ज्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शिल्पाने कबूल केले की, तिने '&TV' वरील लोकप्रिय भाबीजी घर पर हैं या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर केलेले लैंगिक छळाचे आरोप निराधार होते. मालिका सोडून जवळपास दहा वर्षांनंतर केलेल्या या कबुलीमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत त्या काळातील परिस्थिती आणि आपल्या भूमिकेबाबत सविस्तर भाष्य केले.
जेव्हा संपूर्ण इंडस्ट्री विरोधात उभी राहिली
या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि आपल्या निर्णयाबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, "त्या वेळी मला खूप त्रास दिला जात होता. आज मी कोणत्याही गोष्टीवर ठामपणे उभी राहू शकते, तर ते माझ्या प्रामाणिकपणामुळे आहे. त्या काळात माझ्यावर कोट्यवधी रुपयांचे आरोप करण्यात आले होते. एकीकडे मालिका सुरू होती, पण दुसरीकडे मला काम करण्यास स्पष्टपणे मज्जाव करण्यात आला होता. मला सांगण्यात आले होते की, आता तुम्ही काम करू शकत नाही."
एकट्याने लढलेल्या संघर्षामागील कटू वास्तव
शिल्पा यांनी सांगितले की, त्या काळात त्या पूर्णपणे एकट्या पडली होती आणि संपूर्ण इंडस्ट्री त्यांच्याविरोधात उभी राहिली होती. एवढ्या मोठ्या संकटानंतरही त्यांनी हार मानली नाही.
त्या म्हणाल्या, "मी घाबरले नाही कारण मला सांभाळून घेणारे किंवा माझी जबाबदारी घेणारे कोणी नव्हते. एखाद्या चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तीवर विनाकारण चिखलफेक केली जाते, तेव्हा त्याला किती वेदना होतात हे लोकांसमोर येणं आवश्यक होतं."
त्या पुढे म्हणाल्या, "कायद्याच्या चौकटीत मला ज्या प्रकारे त्रास दिला जात होता, त्या परिस्थितीत माझ्या जागी दुसरी कोणती स्वाभिमानी मुलगी असती तर कदाचित वेगळा निर्णय घेतला असता. माझ्या मनातही अनेक विचार आले. पण जर मी आत्महत्या केली असती, तर काही दिवसांनी लोक सर्व विसरले असते आणि मला भ्याड ठरवले असते."
कपडे आणि पैशांच्या मागणीच्या आरोपांनी दुखावले
मनोरंजन क्षेत्राला आयुष्यातील अनेक वर्षे दिल्यानंतरही त्या काळात शिल्पाला अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. तिने सांगितले की, तिच्यावर गरजेपेक्षा जास्त कपडे आणि पैशांची मागणी केल्याचे खोटे आरोप लावण्यात आले. या आरोपांमुळे तिला मानसिक त्रास झाला.
तिने असा दावा केला की, तिचा जाणूनबुजून अपमान करण्यात आला आणि तिला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली.
CINTAA मधून बाहेर काढल्याचे दुःख आणि कायदेशीर अडचणी
आपल्या अनुभवांबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, "मी CINTAA मध्ये सदस्य असतानाही मला तेथे अपमानास्पद वागणूक मिळाली आणि अखेर मला संघटनेतून बाहेर काढण्यात आले. माझ्याशी अत्यंत खालच्या स्तरावरचे वर्तन करण्यात आले होते. त्यामुळे त्रासून मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला."
त्या पुढे म्हणाल्या, "माझ्यासाठी कायदेशीरदृष्ट्या हे स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक झाले होते की मानहानी म्हणजे नेमके काय असते. एखाद्या निरपराध व्यक्तीची प्रतिमा खराब झाल्यावर त्याला किती वेदना होतात, हे लोकांनी समजणे गरजेचे होते. त्या वेळी माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता."