

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे. "सौभाग्यवती सरपंच" या नवीन वेबसीरीजमध्ये हे दाखवण्यात आले आहे की, गावातील महिला जेव्हा समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतात, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. परंतु या महिलांनी दाखवून दिले की, जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. तिथे समाजाची खरी प्रगती होते. संतोष कोल्हे दिग्दर्शित, या सीरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले आणि अश्विनी कुलकर्णी सारखे उत्तम कलाकार पाहायला मिळतील.
दादाराव, गावाचा दोन टर्म सरपंच, ज्याचे जीवन केवळ राजकारणापुरते मर्यादित असते. दुसरीकडे, अवली ही एक सामान्य गृहिणी आहे, जी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली असून तिचे जीवन नवरा, मुलगा आणि सासू यांच्या भोवती फिरत असते. मात्र, जेव्हा महिलांच्या हातात सत्ता येते, तेव्हा त्या कर्तृत्वाची ताकद दाखवून देतात, हे अवलीच्या प्रवासातून दिसून येते.
सरपंचपदावर निवड झाल्यानंतर, अवली गावातील समस्यांवर तोडगा काढते, महिलांसाठी नवी दालने उघडते आणि संपूर्ण गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देते. परंतु या प्रवासात तिच्या समोर अनेक अडचणी येतात – कधी घरातील अपेक्षांचा ताण, तर कधी गावातील प्रश्नांवर उपाय शोधण्याची गरज. मात्र, तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये गावाच्या भल्यासाठीची तळमळ आणि कुटुंबाच्या आनंदासाठीचा त्याग दिसतो, जो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडतो. घराची, जवळच्या नात्यांची व सरपंपदाची जबाबदारी पार पडत असताना अडचणी उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर ती कसे तोडगे काढते, हे बघण्यासारखे आहे. ही सीरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येईल.