Prakash Raj voter ID case : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एकापेक्षा जास्त राज्यांची मतदार ओळखपत्रे असल्याचा त्यांच्यावर आरोप असून, या वॉरंटमुळे त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
वकील दिलीप कुमार यांनी २०१९ मध्ये बंगळूर येथील हलासुरू गेट पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केली होती. प्रकाश राज यांच्याकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासह चार राज्यांची मतदार ओळखपत्रे असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. हे आरोप सिद्ध झाले, तर तो निवडणूक नियमांचे थेट उल्लंघन ठरेल.
तक्रारदार दिलीप कुमार यांच्या मते, पोलिसांनी या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू शहर पोलिस आयुक्त आणि भारतीय निवडणूक आयोगाकडेही दाद मागितली. मात्र, दोन्ही ठिकाणांवरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, भारतातील कोणत्याही नागरिकाला देशात केवळ एकाच ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करता येते. प्रकाश राज यांच्याकडे एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे असल्याने त्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
४८ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACJM) न्यायालयाने यापूर्वी अभिनेते प्रकाश राज यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दोनदा समन्स बजावले होते. मात्र, दोन्ही तारखांना प्रकाश राज न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत.समन्स बजावूनही वारंवार गैरहजर राहिल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आता त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता प्रकाश राज यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.