

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करतेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील लोकप्रिय पात्र अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत माजी समाजकल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत. मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या धामधुमीत यशवंतराव भोंसलेंच्या एन्ट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले, ‘जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय. अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. माजी समाजकल्याण मंत्र्याची भूमिका मी साकारत आहे. यशवंतराव भोसलेंच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो. कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे. जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळतेय, याचा आनंद वेगळा आहे.’
लग्नानंतर होईलच प्रेम सायंकाळी ७.०० वाजता स्टार प्रवाहवर पाहा.