

कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टी यांच्या आगामी 'कांतारा चॅप्टर १' (KantaraChapter1) या चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली. बुधवारी ७ मे रोजी चित्रपट शूटिंगदरम्यान कर्नाटकातील कोल्लूर येथील सौपर्णीका नदीत बुडून एका आर्टिस्टचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण सेट दु:खात बुडला असून शोककळा पसरली आहे. या आधीही कांतारा सेटवर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे आता या घटनेमुळे 'कांतारा' सेटवरच भुताटकी आहे की काय?, असे शंकास्पद प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दाक्षिणात्य स्टार ऋषभ शेट्टी सध्या 'कांतारा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'कंतारा: चॅप्टर १' च्या निर्मितीवेळी उद्भवलेल्या परिस्थितीने गोंधळाचे आणि दुःखद वळण घेतले आहे. चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एका ज्युनियर आर्टिस्टचा जवळच्या नदीतच बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना एका लोकेशन शूटिंग दरम्यान घडली, ज्यामुळे चित्रपटाच्या चालू वेळापत्रकावरच परिणाम झाला आहे. या दुर्घटनेमुळे चित्रपटाचे शूटिंग पुन्हा स्थगित करण्यात आले असून, हा चित्रपट आता २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'कांतारा चॅप्टर १' चित्रपट शूटिंगदरम्यान मृत्यू झालेल्या ज्युनियर आर्टिस्ट नाव कपिल असे होते. बुधवारी (७ मे) दुपारी कोल्लूर सौपर्णीका नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, ज्युनियर आर्टिस्ट त्याच्या जेवणाच्या सुट्टीत पोहण्यासाठी नदीत गेला होता, पण अचानक जोरदार प्रवाहात अडकला आणि तो वाहून गेला.
या घटनेनंतर स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन विभागाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. दुःखाची गोष्ट म्हणजे कपिलचा मृतदेह त्याच संध्याकाळी नदीत सापडला. कोल्लूर पोलिस ठाण्यात औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांनी अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांचा तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटाच्या निर्मितीला गालबोट लागले असून, संपूर्ण सेटवरील कलाकार दुःखात बुडाले आहेत.
कांताराच्या सेटवर अशी दुर्घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी देखील चित्रपट निर्मात्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे. याआधीही, निर्मिती दरम्यान अनेक अडथळे आले होते. कोल्लूरमध्ये ज्युनिअर आर्टिस्टना घेऊन जाणारी एक बस पलटली होती. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अडचणींशिवाय, एक भव्य आणि महागडा सेट अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आणि जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झाला होता. याशिवाय, शूटिंगदरम्यान स्थानिक परिसंस्थेला बाधा पोहोचवल्याचा आरोप करत वन विभागानेही क्रूवर टीका केली होती, ज्यामुळे हा प्रकल्प आणखी संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.