

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठी चित्रपटांच्या सुवर्ण इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. व्ही शांताराम यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अभिनेत्री संध्या, ललिता पवार आणि पंडितराव नगरकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला आहे. अमर भूपाळी सिनेमातील लता मंगेशकर, आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांच्या आवाजातील घनश्याम सुंदरा, लटपत लटपत आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला... ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ७५ वर्ष उलटून गेली तरी आजही ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. तर शाहीर होनाजी बाळा यांनी ही गाणी लिहिली होती.
मराठी चित्रपटाचा हा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याला दुपारी १ वाजता अमर भूपाळी सिनेमा प्रवाह पिक्चरवर पाहता येणार आहे.