

पुढारी ऑनलाईन डेस्क : धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या आणि सुपरस्टार अक्षय कुमार अभिनीत ‘केसरी चैप्टर 2’ नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून ‘केसरी 2’ ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही शानदार कामगिरी करत आहे. ‘स्काय फोर्स’नंतर आता ‘केसरी चैप्टर 2’ अक्षय कुमारचा या वर्षातील दुसरा यशस्वी चित्रपट ठरू शकतो. चला तर पाहूया, कोणती आहेत ती 5 कारणे, ज्यामुळे फक्त तीन दिवसांतच ‘केसरी 2’ एक आवर्जून पाहावा असा चित्रपट बनला आहे.
सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करणे आव्हानात्मक असते. बॉलिवूडचे चित्रपट निर्मात्यांनी हे आव्हान गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या पेलले आहे. ‘केसरी चैप्टर 2’ याच यादीतील महत्त्वाचा चित्रपट आहे. 1919 साली अमृतसरच्या जलियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आणि अक्षय कुमार अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणत आहे. इतिहासाची पाने उलटणारा ‘केसरी 2’ पाहिल्यानंतर तुम्हालाही ब्रिटिश सत्तेखाली भारतीयांवर झालेल्या अत्याचारांकडे डोळसपणे पाहता येईल.
‘केसरी चैप्टर 2’ मध्ये अक्षय कुमारने वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. नायर यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात जलियनवाला बाग हत्याकांडामागील सत्य समोर आणले होते. आपल्या भूमिकेत अक्षयने 100 टक्के समर्पण दिल्याचे पहायला मिळते. दुसरीकडे, ब्रिटिशांचे समर्थन करणारे अँग्लो-इंडियन वकील नेव्हिल मॅककिनले यांच्या भूमिकेत आर. माधवन यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. दिलरीत गिलच्या भूमिकेत अनन्या पांडे प्रभावी दिसते, तर जनरल डायरच्या भूमिकेत विदेशी अभिनेता सायमन पेस्ली डे याने देखील दमदार कामगिरी केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी याने उत्तमरित्या केले आहे. तसेच त्याच्या लेखणीतून ताकदीची पटकथा उतरली आहे. सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवताना निर्मात्यांसमोर वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ते कितपत खरे उतरेल याचे मोठे आव्हान असते. ‘केसरी 2’मध्ये करणने हे काम अत्यंत कुशलतेने निभावले आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग इतके वास्तववादी वाटतात की ते खरेच समोर घडतायत, असे क्षणभर नक्कीच वाटते.
कोणत्याही चित्रपटासाठी त्याचे संगीत आणि गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘केसरी 2’ मध्येही उत्कृष्ट गीतांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोअर देखील तुम्हाला कंटाळवाणा वाटणार नाही. प्रत्येक सीनच्या गरजेनुसार संगीत दिग्दर्शकाने अत्यंत अचूकपणे संगीताची मांडणी केली आहे, जी संपूर्ण अनुभवाला आणखी प्रभावी बनवते.