पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रनौत यांचा चित्रपट ‘इमरजेंसी’सध्या चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगना यांनी सीबीएफसी बोर्डाच्या रिवायजिंग कमिटीच्या सुचनांवर आपली सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.
चित्रपटाच्या रिलीज वरून आज बॉम्बे हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. दरम्यान, सीबीएफसीने बॉम्बे हायकोर्टाला सांगितले की, कंगना रनौत, ज्या 'इमरजन्सी'च्या सह-निर्मात्या आहेत, बोर्डाद्वारे सुचवलेल्या कट्सवर त्यांनी सहमती दर्शवली आहे. बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, सीबीएफसीचे प्रतिनिधित्व करणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी जस्टिस बीपी कोलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या बेंच समक्ष ही माहिती दिली.
हा चित्रपट आधी ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता. रिलीजसाठी प्रमाणपत्र न मिळाल्याने हा वाद कोर्टात गेला. कंगना इमरजन्सी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक, सह-निर्मातीदेखील आहे.
रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने मागील सुनावणीत कोर्टाला म्हटलं होतं की, कंगना रनौत यांचा चित्रपट 'इमरजेंसी' ला U/A सर्टिफिकेट सोबत मंजूरी दिली आहे. पण चित्रपटामध्ये जवळपास १३ कट्स लावले आहेत. बोर्डाचे वकील म्हणाले होते की, जोपर्यंत काही सीन्स कट केले जात नाहीत, तोपर्यंत चित्रपट रिलीजसाठी हिरवा झेंडा दाखवू शकत नाही.