

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे.
4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन प्रीमियर शो साठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आणि आवश्यक व्यवस्थेच्या अभावामुळे एका महिलेचा चेंगरून मृत्यू झाला. तर त्या महिलेचा मुलगा यामध्ये जखमी झाला, असा आरोप करण्यात आला असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
'पुष्पा 2' च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी म्हणजे, ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा (एम रेवती) मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने दुख: व्यक्त केले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला ज्यात त्याने घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता.
अल्लू अर्जुनने या घटनेनंतर तेलंगणा उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्याने म्हटलं होते की, या घटनेत आपली कोणतीही चूक नाही. त्यावेळी मी दुर्दैवाने तिथे उपस्थित होतो.