निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा पार पडणार! | पुढारी

निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा पार पडणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘निवेदिता, माझी ताई!’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली. ही गोष्ट एका अशा नात्याची आहे जी घराघरांत घडते. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं… एक असं निरपेक्ष नातं, जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं… ते नातं म्हणजे… बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित अशी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण मालिका आहे. असीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहे. पण मालिकेत एक रंजक वळण आलं आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न.

निवेदिताचं लग्न झाल्यावर ती असीमपासून दुरावली जाणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण निवेदिताचं लग्न मकरंदसोबत ठरलं आहे. मकरंदला निवेदितासोबत लग्न करायचं आहे, पण तो सायको असल्याचं यशोधनला समजतं. यशोधन पुरावे जमा करतो आणि निवेदिता आणि मकरंद यांच्या लग्नात येऊन मकरंदचं पितळ उघडं पाडतो.

ऐन लग्नात धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. निवेदिताचं लग्न कसं‌ पार पडणार, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मकरंदसोबतचं लग्न मोडून मकरंदचा प्लॅन हाणून पाडण्यात यशोधनला यश मिळेल का? त्याचं निवेदितावर असलेलं प्रेम यातून त्याला व्यक्त करता येईल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. मकरंदने रचलेला प्लॅन अखेर निवेदिता आणि त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत येऊन ठेपला आहे. पण त्याचं या आधीचं लग्न आणि त्याने आखलेला प्लॅन यांबाबत निवेदिता आणि तिच्या घरचे अजूनही अनभिज्ञ आहेत.

यशोधन सगळे पुरावे जमा करून मकरंदचा प्लॅन भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करेल, पण यामुळे निवेदिता आणि मकरंद यांचं लग्न मोडण्यात त्याला यश मिळेल का? यापुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे निवेदिताच्या लग्नाचा. यशोधन सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करून निवेदितासोबत लग्नाला उभा राहणार असून निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे. पण या सगळ्यांत असीमची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उभा राहणार आहे. यशोधन असीमची जबाबदारी नक्की घेईल, असा निवेदिताचा समाज आहे.

निवेदिता आणि यशोधन यांचा विवाहसोहळा पाहायला नक्की या. ‘निवेदिता माझी ताई’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Back to top button