IFFI 2023 : आपल्या वयाची जाण ठेवून भूमिका स्वीकाराव्यात : राणी मुखर्जी | पुढारी

IFFI 2023 : आपल्या वयाची जाण ठेवून भूमिका स्वीकाराव्यात : राणी मुखर्जी

प्रभाकर धुरी

पणजी

अभिनेत्यांनी आपल्या वयाची जाण ठेवून त्यानुसार भूमिका स्वीकारल्या पाहिजेत. मग प्रेक्षक त्यांचा स्वीकार करतील, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने मांडले. सिने-इंडस्ट्रीत वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने हे मत मांडले. (IFFI 2023) गोव्यात इफ्फीच्या ५४ व्या महोत्सवादरम्यान आज २६ रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जीसमवेत – ‘खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना’ या विषयावरील संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक आणि गलत्ता प्लसचे मुख्य संपादक बरद्वाज रंगन यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात राणी मुखर्जीचे जीवन आणि यशस्वी कारकीर्द उलगडली. (IFFI 2023)

आपल्या चित्रपटांच्या प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली, भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न केल्याचे सांगितले. “चित्रपट आणि त्यांतील व्यक्तिरेखा म्हणजे भारतीय संस्कृतीचे अवलोकन करण्याचा झरोका म्हणून परदेशात त्यांचा विचार केला जातो” असेही त्यांनी सांगितले.

कलेशी इमान राखण्याच्या महत्त्वावर या यशस्वी अभिनेत्रीने भर दिला. “कणखर चित्रपटांच्या आणि भूमिकांच्या समर्थनासाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कधीतरी असे होऊ शकते, त्या-त्या वेळी तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळणारही नाही. परंतु चित्रपटांच्या इतिहासात मात्र अशा चित्रपटांना आणि भूमिकांना निश्चितपणे स्थान मिळेल.”, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अभिनेत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचे महत्त्व मुखर्जी यांनी अधोरेखित केले. “अभिनेते अष्टपैलू असतील तर ते जीवनाचे विभिन्न पैलू समर्थपणे साकारू शकतात. मी माझ्या व्यक्तिरेखांमध्ये जेवढे वैविध्य आणेन तेवढे ते प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी रुचीपूर्ण ठरेल. व्यक्तिरेखांमधील या विविधतेतून मला स्फूर्तीही मिळते.” असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यक्तिरेखा साकारतानाच्या बारकाव्यांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. “काही विशिष्ट भूमिका करताना, वास्तव लकबी समजून घेण्यासाठी अभिनेते वास्तवातील व्यक्तींना भेटतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खऱ्या-खुऱ्या भावभावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. चित्रपटातील एखादा प्रसंग उठावदार ठरतो, तो त्यामागील भावनांमुळे. प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने भावना चितारणे महत्त्वाचे असते”, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, मी वयाला फारसे महत्त्व देत नाही. माझ्या भूमिकांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आले आहे. प्रेक्षकांनी तुमच्या व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवण्याची अर्धी लढाई, तुम्ही तसे दिसलात की जिंकली जाते”, असे सांगत राणी मुखर्जीने वयाविषयी स्वतःचा दृष्टिकोण सांगितला.

आमिर खानचा पहिला चित्रपट ‘लगान’च्या बाबतीत तारखा जुळत नसल्यामुळे मी दुर्दैवाने त्या चित्रपटाचा भाग होऊ शकले नाही”, अशी भावनाही तिने व्यक्त केली.

ब्लॅकमधील भूमिका प्रेरणा आणि आव्हान देणारी

‘कुछ कुछ होता है’ मधील ‘टीना मल्होत्रा’ पासून, ‘कभी अलविदा ना कहना’ मधील ‘माया तलवार’ आणि ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मधील ‘देबिका चटर्जी’ पर्यंत राणी मुखर्जी यांच्या शेकडो सुंदर-सुंदर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकांपैकी सर्वात आवडती भूमिका कोणती- असे विचारले असता तिने, ‘ब्लॅक’ चित्रपटातील भूमिका अंतःकरणाच्या जवळची वाटत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तिरेखेने तिच्यात परिवर्तन घडवून आणले आणि एक माणूस म्हणून स्वतःला अधिक चांगले घडवण्यासाठी मदत केली, असे तिने सांगितले. “ब्लॅकमधील मिशेल मॅकनालीच्या व्यक्तिरेखेने एकाच वेळी मला प्रेरणाही दिली आणि आव्हानही ! ‘मेहंदी’ मधील व्यक्तिरेखेनेही मला सक्षम केले”, असेही ती म्हणाली.

Back to top button