Swara Bhasker : पद्म पुरस्कार येतोय; स्वराचा विक्रम गोखलेंना जोरदार टोला
देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली. तिच्या या वक्तव्यानंतर देशभरात वादंग निर्माण झाले असतानाच, कंगनाच्या वक्तव्याला आपला पाठिंबा असल्याचे म्हणत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही या वादात उडी घेतली होती. कंगना आणि व्रिकम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याला देशभरातून तीव्र विरोध केला जातोय. सर्वसामान्य लोकांपासून चित्रपट सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. या वादात आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) उडी घेतली आहे.
काल (15 नोव्हेंबर) अभिनेता अतुल कुलकर्णी याने ” वयाचा आणि शहानपणाचा दुरान्वये संबंध नसतो” असे ट्विट करून विक्रम गोखलेंना टोला लगावला होता.
Seniority and Wisdom are two different things. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) November 15, 2021
त्यानंतर आज अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhaskar) शेलक्या भाषेत ट्विट करून विक्रम गोखलेंवर निशाणा साधलाय.
विक्रम गोखलेंनी कंगना रणौतला पाठिंबा दिल्याच्या वृत्ताचे, ट्विट शेअर करत “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Swara Bhaskar)
Padma award coming up 🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/aB77GOQFNC
— Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021
काय म्हणाले होते विक्रम गोखले
७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पत्रकारांशी विक्रम गोखले बोलत होते. यावेळी त्यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल, असंही ते म्हणाले. “कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले”, असा गंभीर आरोपही विक्रम गोखले यांनी केला.
“कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे, काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दुैव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही”, असेही विक्रम गोखले म्हणाले.
या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली होती
चित्रपटातील योगदानाबद्दल कंगनाला ८ नोव्हेंबर रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,” असं ती म्हणाली होती.