KBC : श्रीदेवची कहाणी ऐकून अमिताभ बच्चन यांनाही गलबलून आले
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC ) या ज्ञान-आधारित शोमध्ये दृढ निर्धार आणि चिकाटीचे सामर्थ्य दाखवणारी कहाणी पाहायला मिळेल. शोमध्ये तळेगावहून आलेल्या श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून बिग बी अमिताभ बच्चन देखील गलबलून गेले. (KBC )
संबंधित बातम्या –
- Kundara Johny : मल्याळम अभिनेता कुंद्रा जॉनी काळाच्या पडद्याआड
- महेश मांजरेकरांचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
- Alia Bhatt National Award : पुरस्कारावेळी आलियाने लग्नाची साडी नेसली; खास कारण समोर
२०११ मध्ये एका दुर्दैवी कार अपघातात श्रीदेवचे कमरेखालील शरीर दिव्यांग झाले. तो व्हिलचेअरवर खिळला. परंतु त्याने हार मानली नाही आणि तो आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत राहिला. शारीरिक अक्षमतेला न जुमानता त्याने KBC मध्ये येण्याचे प्रयत्न अविरत चालू ठेवले, जेणेकरून त्याच्यासारख्या दिव्यांग लोकांना प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या उपचारांसाठी त्याला मोठी रक्कम जिंकता यावी.
सेटवरील सूत्राने सांगितले, “श्रीदेवची कहाणी ऐकून अमिताभ बच्चन हेलावून गेले. या परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी आणि जया वानखेडे या त्याच्या पत्नीने त्याला जो खंबीर आधार दिला, त्याचे त्यांनी खूप कौतुक केले. हताशेच्या मनःस्थितीतून आपल्या माणसाला बाहेर काढण्यात कुटुंबियांची भूमिका किती महत्त्वाची असते, यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांमधील या अद्भुत शक्तीला सलाम करताना त्यांनी जया वानखेडेच्या नावाने जयघोष केला!”
आपल्या प्रवासाविषयी सांगताना श्रीदेव म्हणाला, “२०११ मध्ये माझा अपघात झाल्यानंतर मी हताशेच्या गर्तेत गेलो होतो. पण माझी बालपणीची मैत्रीण, जी आता माझी पत्नी आहे, तिने मला यातून बाहेर काढले. अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग जयाने मला दाखवला आणि हे शिकवले की, प्रेम आणि निर्धारामुळे अगदी कितीही कठीण लढाई असली तरी ती जिंकता येऊ शकते. त्यानंतर मी मग कधीच मागे वळून पाहिले नाही.
कौन बनेगा करोडपतीसारख्या शोमध्ये सहभागी होण्याचे धाडस मला जयाने दिलेल्या आधारातून मिळाले. या सेटवर अमिताभ बच्चन केवळ या शोचे सूत्रसंचालन करत नाहीत. तर स्पर्धकाला भक्कम आधारही देतात. त्यांनी माझी व्हीलचेअर खेचत आणली, मला डोळे पुसायला टिशू दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या स्वप्नावर विश्वास ठेवला. माझ्या निराशेच्या काळात मला साथ देणाऱ्या माझ्या पत्नीचे त्यांनी गुणगान केले. त्या क्षणी मला हे जाणवले की, हा लढा फक्त माझा नव्हता, तर माझ्यावर विश्वास असलेल्या अनेकांचा तो लढा होता.” १८ ऑक्टोबर रोजी हा एपिसोड सादर होणार आहे.