रंग माझा वेगळा, ठरलं तर मग…मालिकांचे आषाढी एकादशी विशेष भाग | पुढारी

रंग माझा वेगळा, ठरलं तर मग...मालिकांचे आषाढी एकादशी विशेष भाग

पुढारी ऑनलाईन डेस्क : आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही आषाढी एकादशी विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा विठ्ठलाची मनापासून आराधना करते. प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगी विठुमाऊलीनेच दीपाची साथ दिलीय. दीपाचं आयुष्य आता निर्णायक वळणावर असताना विठुरायाच्याच साक्षीने दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होणार आहेत. एकीकडे दीपाच्या विरोधात कट रचल्याची जाणीव कार्तिकला होणार आहे. तर साक्षीचा खून आयेशानेच केल्याचा पुरावा दीपाच्या हाती लागला आहे. कार्तिकला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच्या दीपाच्या या प्रयत्नांना विठुराया यश देणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.

दीपा-कार्तिक प्रमाणेच तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही मंजुळा आणि मल्हारच्या नात्यात नवं वळण येणार आहे. मंजुळालाच आपली आई समजणाऱ्या स्वराजने विठुमाऊलीला आपल्या आई-बाबांची भेट व्हावी यासाठी साकडं घातलं आहे. आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात मोनिकासह दर्शनसाठी पोहोचलेला मल्हार पहिल्यांदा मंजुळाचा चेहरा पाहणार आहे. वैदेहीसारख्याच दिसणाऱ्या मंजुळाला पाहून मल्हारला धक्का बसणार आहे. मंजुळा आणि मल्हारच्या नात्यात नेमकं कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

मन धागा धागा जोडते नवा मालिकेत आनंदी स्पर्धेसाठी बनवलेली साडी विठ्ठलाच्या चरणापाशी ठेऊन यशासाठी प्रार्थना करत असतानाच अंशुमन मंदिरातून ती साडी गायब करतो. इतक्या मेहनतीने बनवलेली साडी गायब झाल्याचं लक्षात येताच आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. विठ्ठलाच्या आशीर्वादाने आनंदीला तिची साडी परत कशी मिळणार हे मन धागा धागा जोडते नवाच्या पुढील भागांमधून उलगडेल.

Back to top button