सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एन्ट्री | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एन्ट्री

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

जवळपास ३० वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर ‘मंगल’ची सुटका झाली आहे. सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे जयदीपची आई. ३० वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरविलं आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक ही ‘मंगल’ची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना अतिशा नाईक म्हणाली की, बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा या कुटुंबासोबत जोडली जाते याचा मला आनंद आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतलं मंगल हे पात्र साकारताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. ३० वर्ष कारावासात राहून आलेल्या मंगलची दहशत आहे. तिचा स्वभाव फारच रुक्ष आहे. आपल्या मुलाच्या भेटीसाठी आसुसलेली आणि ज्यांच्यामुळे मुलगा दुरावला अशांना अद्दल घडवू पाहणारी ही मंगल मी साकारणार आहे. अशा पद्धतीची व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारणार आहे. आता सर्वच सहकलाकारांसोबत माझी छान मैत्री झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button