Manoj Bajpayee : ‘साऊथ’ चित्रपटांच्या यशाने बॉलिवूडला भरली धडकी, मनोज वाजपेयीचे बेधडक विधान | पुढारी

Manoj Bajpayee : ‘साऊथ’ चित्रपटांच्या यशाने बॉलिवूडला भरली धडकी, मनोज वाजपेयीचे बेधडक विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने बॉलिवूडचे फिल्ममेकर्स आणि निर्माते घाबरले आहेत. याबाबत प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने (manoj bajpayee) मोठे विधान केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची स्तुती करत एका मुलाखतीदरम्यान दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाने बॉलिवूडचा थरकाप उडाल्याचे धक्कादायक वक्तव्य त्याने केले आहे.

मनोज वाजपेयी (manoj bajpayee) म्हणाला, KGF Chapter 2, RRR आणि पुष्पाच्या यशाने सगळेच हादरले आहेत. दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीकडून बॉलीवूडने लवकरात लवकर शिकायला हवे, असा मोलाचा सल्ला त्याने दिला आहे.

दाक्षिणात्य चित्रपट हिंदी पट्ट्यातही बॉक्स ऑफिसवर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्याचवेळी एकत्र प्रदर्शित होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये यावरून खळबळ उडाली आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने हिंदी पट्ट्यात बंपर कमाई केली. यानंतर एसएस राजामौली यांच्या RRR आणि KGF Chapter 2 या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले. दोन्ही चित्रपटांच्या हिंदी डब व्हर्जनने प्रत्येकी 300 कोटींहून अधिकची कमाई केली. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत. (manoj bajpayee)

नुकतेच चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले होते की, उत्तरेचे लोक दक्षिणेचा हेवा करतात. आता मनोज वाजपेयी यांनी दिल्ली टाइम्सशी केलेल्या संभाषणात महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, ‘दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातून अनेक ब्लॉकबस्टर्स घडले, घडत आहेत. मी आणि माझ्यासारख्या इतरांना एका मिनिटासाठी विसरून जा. मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते ‘दाक्षिणात्य चित्रपट’ आणि त्याची प्रसिद्धी पाहून थक्क झाले आहेत. त्यांना काय करावे ते समजत नाहीय.’ (manoj bajpayee)

हिंदीतून इतर भाषेत डब केलेले चित्रपट स्पर्धेत खूप मागे..

KGF 2 आणि RRR सारखे चित्रपट हिंदीत डब करूनही 300 कोटींहून अधिक गल्ला जमवतात. पण दाक्षिणात्य भाषेत डब केलेला सूर्यवंशी चित्रपट 200 कोटींची कमाई करण्यात अपयशी ठरतो. दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशातून बॉलिवूड निर्मात्यांनी धडा घ्यायला हवा. ते उत्कट आहेत आणि प्रत्येक शॉट असे शूट करतात की जणू जगातील सर्वोत्तम शॉट देत आहेत. प्रेक्षकांवर सर्वकाही लादले जात नाही. कारण ते त्यांच्या प्रेक्षकांना खूप आदर देतात, असेही वाजपेयी म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, जर तुम्ही पुष्पा, आरआरआर आणि केजीएफकडे पाहिले तर ते स्पष्ट आहे. प्रत्येक फ्रेममध्ये जीवन-मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इथेच आपली चूक होते. आम्ही मुख्य प्रवाहातील चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी बनवले आहेत. आपण त्यांच्यावर टीका करू शकलो नाही, तर आपण त्यांना ‘वेगळे’ म्हणू लागतो. पण मेनस्ट्रीम सिनेमा कसा बनवायचा याचा मुंबई इंडस्ट्रीतील मुख्य चित्रपट निर्मात्यांसाठी दाक्षिणात्य चित्रपटांकडून धडा घ्यायला हवा, असा गंभीर सल्लाही मनोज वाजपेयीने यावेळी दिला.

Back to top button