भाजप- शिंदे गटाकडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा : आमदार रोहित पवार यांची टीका

भाजप- शिंदे गटाकडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा : आमदार रोहित पवार यांची टीका
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले होते, हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला गेला, कर्नाटकात छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा गप्प असणारी मंडळी सध्या सावरकरांच्या विषयावरून रणकंदन माजवत आहेत. काॅंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात दरी पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार पवार म्हणाले, महाविकास आघाडीत या विषयावरून फूट पडेल असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेले असले तरी त्यांची ही प्रतिक्रिया तत्कालीन आहे. त्यातून मविआला तडा जाईल, असे अजिबात नाही. मविआमध्ये फूट पडावी असे भाजप- शिंदे गटाला वाटत असल्याने त्यांनी या प्रकरणात जादा ताकद लावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांपत्यांच्या बाबतीत त्यांना राजकीय फायदा दिसला नव्हता. सावरकर प्रकरणात तो दिसत आहे. शिवाय मविआमध्ये काही बिनसले तर आगामी निवडणूका सोप्या जावू शकतात, असे त्यांना वाटत असल्याने या विषयाला फूस दिली जात असल्याचे आमदार पवार म्हणाले.

सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी, खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात मी राजकारण बाजूला ठेवून राहूल गांधी यांना दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखान समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला, हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे ते म्हणाले.

काॅंग्रेस नेते राहूल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून विविध मुद्दे पुढे आले आहेत. सुरुवातीला टिकलीचे प्रकरण निघाले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका मंत्र्याने अवमानजनक वक्तव्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर दुसरी केस त्यांच्यावर टाकली गेली. खासदार राऊत यांचा जामिन रद्द व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली गेली. हे सगळे मुद्दे महाराष्ट्रात यात्रा असतानाच का निघाले? असा सवाल आमदार पवार यांनी केला. यात्रेला मिळणारा प्रतिसाद लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा प्रश्न मलाच नव्हे तर लोकांनाही पडू लागल्याचे आमदार पवार म्हणाले.

राहूल गांधी यांच्या यात्रेत मी सहभागी झालो. दोनवेळा त्यांची भेट घेतली. पुस्तकांसह उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचा अल्बम व देवीची प्रतिमा भेट दिली. त्यांच्याशी चर्चेत मनरेगाचा मुद्दा मांडला. ग्रामीण भागासाठी सुरु असलेल्या या योजनेप्रमाणे शहरासाठी योजना पाहिजे अशी मागणी केली. गांधी यांच्या यात्रेत देशभरातील विविध स्तरातील लोक उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत कोणालाही पैसे देवून यात्रेसाठी आणले गेले नाही, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news