राजमाता जिजाऊ माँसाहेब करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या, तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातील प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले; पण स्वराज्याचा आधारवड, प्रेरणा जिजामाता होत्या. जिजाऊ शूर, पराक्रमी, बुद्धिमान, निर्भीड होत्या. तशाच त्या सुंदर होत्या, असे परमानंद लिहितो… आज जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्ताने!
जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. दुसर्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे, ही स्फूर्ती हतबल झालेल्या जनतेत जिजाऊंनी निर्माण केली. आपणही लढू शकतो, आपणही जिंकू शकतो आणि आपणही उत्तम राज्यकारभार करू शकतो, ही स्फूर्ती भारतीयांमध्ये जिजाऊंनी निर्माण केली. त्यांनी दिलेली स्फूर्ती घेऊन मराठे पुढे अनेक वर्षे मोगलांविरुद्ध लढले. राजमाता जिजाऊ माँसाहेब या केवळ शिवरायांच्या माता एवढीच मर्यादित ओळख नाही, जसे त्यांनी शिवरायांना घडविले, तसेच नातू संभाजी राजांनादेखील घडविले. आपले क्रांतिकारक पती शहाजीराजे यांच्या महत्त्वाकांक्षी आणि शौर्यशाली कार्य कर्तृत्वाला तशीच खंबीरपणे साथ दिली. प्रजेला अत्यंत मायेने वागविणार्या त्या स्वराज्याचा आधारवड होत्या. जिजामाता या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान होत्या. बालपणापासूनच त्या तलवारबाजी, प्रशासन, घोडेस्वारी आणि युद्धकलेत निपुण होत्या. वडील लखुजीराजे आणि आई म्हाळसादेवी यांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता वाढविले.
जिजाऊंनी आपल्या जीवनात अनेक दु:खद घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या, वडील आणि भावांची देवगिरीच्या भरदरबारातील हत्या, दीर, पुत्र यांनी रणांगणावर लढता-लढता सोडलेले प्राण उघड्या डोळ्यांनी पाहिले, जिजाऊ या संकटसमयी लढणार्या होत्या, रडणार्या नव्हत्या. अनेक संकटे आली, तरी त्या नाउमेद झाल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, खचल्या नाहीत, तर त्या संकटाला सामोरे जाणार्या धैर्यशाली होत्या. त्यांनी बालशिवबाला मांडीवर बसवून खेडशिवापूर येथे न्यायनिवाडा केला, अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय दिला. महिलांवर अन्याय, अत्याचार करणार्या नराधमांना शिक्षा ठोठावल्या. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातील प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचे स्वत:चे गुप्तहेर खाते होते. त्यामार्फत त्या शिवबाला सतत सतर्क करत असत, तसेच त्या उत्तम न्यायाधीश होत्या. पूर्वी दिलेले अन्यायी निवाडे त्यांनी फिरवून पुन्हा योग्य न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले.
शिवाजीराजे जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. तेव्हा जिजाऊंनी हातात तलवार घेतली, घोड्यावर बसल्या आणि राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या. त्याप्रसंगी त्या म्हणतात, 'आता जाते आणि त्या सिद्दीला ठार करून शिवबाला सोडवून आणते.' या प्रसंगाचे रसभरीत वर्णन समकालीन कविंद्र परमानंदाने 'शिवभारत' या ग्रंथात केलेले आहे. यावरून स्पष्ट होते की, जीवघेण्याप्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत बसणार्या नव्हत्या, तर हातात तलवार घेऊन रणांगण गाजविणार्या शूरवीर होत्या. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता; पण भाबडेपणाने पूजाअर्चा करण्यात त्यांनी संकटसमयी वेळ दौवडला नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले; पण स्वराजाचा आधारवड, प्रेरणा जिजामाता होत्या. त्यामुळेच शाहीर अमर शेख जिजाऊंबद्दल लिहितात.
आला आला शिवाजी आला।
योग्य समयाला। जिजाऊन दिला?
थोर त्या आईचे उपकार।
थोर त्या मातेचे उपकार?
मराठ्यांनो, तुमच्याने ते नाही फिटणार जी जी जी?
जिजाऊंचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, असे शाहीर अमर शेख लिहितात.
जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. सर्व जाती-धर्मांतील लोकांना अत्यंत मायेने-ममतेने, आपुलकीने वाढविले. त्या काळात स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला मावळा म्हटले जात असे. मावळाई या इंद्रायणी खोर्यातील प्राचीन काळातील मातृसत्ताक महामातेच्या नावावरून 'मावळा' हा शब्द आला, असे प्राच्यविद्या पंडित डी. डी. कोसंबी म्हणतात, मावळा हा शब्द स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करतो. तसाच तो शब्द भेदभाव बाळगत नाही. मावळा म्हणजे आपण सर्वजण. जिजाऊंनी मावळ्यांना आपुलकी, जिव्हाळा, आधार दिला. शिवाजीराजेे आग्राकैदेत असताना स्वराज्य हिंमतीने राखण्याचे कार्य जिजाऊंनी केले. पती निधनानंतर सती न जाता, पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या ग्रंथप्रामाण्यवादी किंवा अंधश्रद्धाळू नव्हत्या, म्हणूनच त्यांनी सतीप्रथा लाथाडली. ही मध्ययुगीन काळातील क्रांतिकारक घटना आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध मोडून राज्याभिषेक पार पाडणे, यात जिजाऊंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या जशा राजकीय विरोधकांच्या विरुद्ध लढल्या तशाच त्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरुद्धदेखील लढल्या.
जिजाऊ शूर, पराक्रमी, बुद्धिमान, निर्भीड, बुद्धिप्रामाण्यवादी, धैर्यशाली, महत्त्वाकांक्षी होत्या. तशाच त्या सुंदर होत्या, असे परमानंद लिहितो. शहाजीराजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो.
जशी चंपकेशी खुले फुलजाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई?
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला।
अर्थ – जिजाऊ शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाला पत्नी म्हणून शोभून दिसते, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांची कीर्ती सर्व भरतखंडावर पसरलेली आहे. त्यांच्या कीर्तीच्या सावलीखाली सर्व सज्जन लोक आश्रयाला येतात. अर्थात, सर्वांना मायेची सावली देणार्या जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो असे नाही, तर मुलगीदेखील वंशाला दिवा असते. दुसर्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे, ही स्फूर्ती हतबल झालेल्या जनतेत जिजाऊंनी निर्माण केली. आपणही लढू शकतो, आपणही जिंकू शकतो आणि आपणही उत्तम राज्यकारभार करू शकतो. ही स्फूर्ती भारतीयांमध्ये जिजाऊंनी निर्माण केली. त्यांनी दिलेली स्फूर्ती घेऊन मराठे पुढे अनेक वर्षे मोगलांविरुद्ध लढले. घराघरांत शिवाजीराजे, संभाजीराजेंसारख्या विचारांची पिढी निर्माण करावयाची असेल, तर घरोघरी जिजाऊंसारख्या माता निर्माण होणे गरजेचे आहे.