वास्तविक कोरोनानंतर जगाची झालेली स्थिती पाहता आर्थिक व्यवहार व्यापक प्रमाणात मंदावले होते आणि परिणामी लोकांच्या मनात अर्थव्यवस्थेवरून शंका निर्माण झाल्या होत्या. जगातील बहुतांश देशांनी आर्थिक संकटाचा मुकाबला केला आणि आजही काही देश त्याखाली भरडले जात आहेत. कोरोनातून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण झालेली असतानाच रशिया-युक्रेन युद्धाने परिस्थिती आणखी बिघडली. आता इस्रायल आणि हमासच्या संघर्षाने नवीन संकट समोर आले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांची स्थिती चांगली राहिलेली नाही. विशेष म्हणजे, चीनच्या विचित्र धोरणामुळे जगातील देश अगोदरच त्रस्त आहेत, शिवाय दहशतवादी घटना, हवामान बदलामुळे निर्माण होणारे नैसर्गिक संकट, चक्रीवादळ, जमीन खचणे आदी घटनांमुळे सर्व देशांसमोर चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. दुष्काळ अतिवृष्टी, ढगफुटी, लहरी हवामान आदी कारणांमुळेदेखील अनेक देशांची स्थिती चांगली नाही. महापुरामुळे पाकिस्तानातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशाचा एक तृतियांश भाग पाण्याखाली गेला होता. या घटनेला वर्ष झालेले असताना आता राजकीय अस्थिरतेने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा घाला घातला गेला आहे. श्रीलंकेची स्थितीही फारशी वेगळी नव्हती.