

मंडळी, आजूबाजूला घडणार्या घटना पाहता तुमच्या असे लक्षात येईल की, बर्याच गोष्टींची तोडफोड झाली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या लक्षात येतात, त्या शासकीय यंत्रणांच्या का लक्षात येत नाहीत, हा गेल्या 80 वर्षांपासून पडलेला प्रश्न तसाच आहे. पुण्याजवळील एका जुन्या पुलावर पाणी आणि निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक आलेले होते. अचानक हा पूल कोसळला आणि अनेक पर्यटक वाहून गेले. आपत्ती निवारणच्या टीम्स जवळपास असल्यामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे सुमारे 38 लोकांचे जीव वाचवण्यात यश आले असले, तरी काही लोक दगावले, ही एक भीषण शोकांतिका आहे. सदरील पूल हा जुना झालेला असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. तशा सूचनेचा बोर्डही तिथे लावलेला होता. नुसता बोर्ड लावून काही उपयोग होईल, अशी शक्यता आपल्या देशात अजिबात नाही.
त्या कमकुवत पुलावरून दररोज अनेक दुचाकी वाहने आणि लोक ये-जा करत होते. एक ना एक दिवस हा पूल कोसळणारच होता. तसा तो कोसळलासुद्धा. आमचे म्हणणे असे आहे की, असे पूल पडायच्या आधीच शासन स्वतःच का बरे पाडून टाकत नाही? जागेवर पूल नसेल, तर लोकांनी विनाकारण त्यावरून ये-जा करण्याचा विषय राहणार नाही.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश आपण अनेक वर्षांपासून देत आहोत. पावसाळ्याच्या काळामध्ये झाडांपासून माणसे वाचवा असे म्हणण्याची वेळ आली आहे. झाड मोठे झाले की, त्याच्या फांद्या विस्तारत जातात. या फांद्या कमकुवत असल्याने थोडे जरी वावटळ आले, तरी या फांद्या तुटून पडतात. सहाजिकच त्यावेळी एखादा दुचाकीस्वार झाडाखालून जात असेल, तर त्याच्या डोक्यात एखादी मोठी फांदी पडते. त्याचा जागेवरच कपाळमोक्ष होतो. हे कुठेतरी टाळले पाहिजे.
मुंबईसारख्या महानगरात असंख्य जुन्या इमारती आहेत, ज्या अत्यंत जीर्ण झालेल्या असून मोडकळीस आलेल्या आहेत. थोडा जास्त पाऊस झाला की, या इमारती ढासळतात आणि त्या ढिगार्याखाली दबून असंख्य लोक मरण पावतात. अशा इमारती मोडकळलेल्या परिस्थितीत न ठेवता आधी पार पाडून टाकल्या पाहिजेत. पावसाळा आला की, अनेक अपघात घडत असतात. त्यातून लोक काही बोध घेत नाहीत. सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटन सुरू आहे. आता नाही, तर कधी लुटायचा पावसाचा आनंद, असे म्हणत अनेक पर्यटक नको त्या ठिकाणी धाडस दाखवत असतात आणि बर्याचवेळा आपला जीव गमावून बसतात. बरे, हे नेहमीचेच झाले आहे. त्यातून लोक काही बोधच घेत नाहीत. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या..’ असा कित्ता गिरवत त्याच चुका करत असतात. पावसाळा आला की, कोणत्याही शहरातील जीर्ण इमारतींची चर्चा होत्या. मग, एखादी दुर्दैवी घटना घडली, तर मग चर्चांना मग आणखीच ऊत येत असतो.