
Alandi Pandharpur Wari 2025
सुनील माळी
ना आमंत्रणाचं औपचारिक कार्ड, ना जेंटल रिमाइंडरचा व्हॉट्सअॅप मेसेज, ना पेपरमध्ये मोठमोठाल्या जाहिराती, ना कुणा नेत्याची प्रेस कॉन्फरन्स...; पण कॅलेंडरमध्ये ज्येष्ठाचा महिना येतो अन् पहिला पंधरवडा सरल्यावर लाखो पावलं आळंदीमध्ये मांडी घालून गेली सव्वासातशे वर्षं आत्मारामाशी रत झालेल्या ज्ञानदेवांकडं तसेच देहूला विठ्ठलकल्लोळात बुडून गेलेल्या तुकोब्बारायाकडं आपोआप वळतात, हरिमुखे म्हणत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं भूलोकीच्या वैकुंठीकडं पडत राहतात...
जगाच्या पाठीवर शिकवल्या जाणार्या मोठमोठ्या मॅनेजमेंटच्या कोर्सेसमध्ये भरती न होताही बहुसंख्य अशिक्षित-अल्पशिक्षितांचा प्रामुख्यानं समावेश असलेला हा जनांचा प्रवाहो काटेकोर शिस्तीनं; पण एकमेकांशी तेवढ्याच प्रेमानं-आस्थेनं वागत वाहत राहतो, भागवत पताका फडकावत सात्त्विकतेनं-भक्तीनं वातावरण भारून टाकतो... प्रश्न पडतो, ही ओढ नेमकी येते कुठून..?
अथांग-अनंत विश्वस्वरूप असलेल्या परमात्म्याचा आपल्या नश्वर शरीरात असलेल्या आत्म्याशी संयोग व्हावा, जिवाचं शिवाशी, पिंडाचं ब्रह्मांडाशी मिलन व्हावं, यासाठी पृथ्वीतलावरच्या साधकांनी पूर्वापार प्रयत्न केले, तो योग जुळून आलेल्या दार्शनिकांनी स्वत:ची सूत्रं बनवली. विविध धर्मांच्या नावांनी त्या सूत्रांचा अवलंब करण्यात येऊ लागला. जगातल्या सर्व तत्त्वज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानानं अद्वैताबरोबरच द्वैताचाही पुरस्कार करताना परमात्म्याला विविध रूपांमध्ये साकारलं.
भक्तिमार्गानं नामस्मरण करत भवसागर तरून जाण्यासाठी सुरुवातीच्या काळात साकारलेल्या सगुण दैवतांची उपासना पद्धती हळूहळू क्लिष्टतेकडं जाऊ लागली. बहुजन जनसामान्यांपासून ती दूर होऊ लागली. लिखित साहित्यात म्हणजे संस्कृतातल्या विविध ग्रंथांमध्ये आध्यात्मिक ज्ञान कोंडलं गेलं आणि केवळ वाचता येणार्या ब्राह्मणादी वर्गापुरतं ते मर्यादित राहू लागलं.
देववाणी म्हणून गौरवलेली वेदवाणी म्हणण्याचा अधिकार समाजातल्या इतर घटकांना नाकारला गेला अन् ते म्हणण्याचा प्रयत्न करणार्यांना भयानक शिक्षा देणारी तत्कालीन एकतर्फी कायद्याची पुस्तकंही पुढं आली. दैवतांच्या संकल्पनांभोवती या अभिजन-वरिष्ठ मानल्या गेलेल्या वर्गाचाच वेढा पडला तेव्हा अशिक्षित-अल्पशिक्षित आणि बव्हंशी शेती करणार्या बहुजनवर्गानं पारमार्थिक कल्याणाबरोबरच ऐहिक उन्नतीसाठीही कोणत्या धर्माचा आधार घ्यायचा? जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानात कर्मकांडाचं स्तोम माजू लागलं.
यज्ञयागाला प्राधान्य देणार्या, बकर्यांपासून घोड्यांपर्यंतच्या प्राण्यांची आहुती देणार्या आणि केवळ विशिष्ट मंडळींनाच आचरणात आणता येणं शक्य असलेल्या वैदिक संस्कृतीला इसवी सनापूर्वीच्या काही शतकांत बौद्ध आणि जैन धर्माने पर्याय देण्याचा प्रयत्न केला. अहिंसेचं तत्त्व, सोपी आचरणपद्धती आणि सर्वांना मुक्त प्रवेश, यांमुळे प्रारंभीच्या काळात या
बौद्ध-जैन धर्माकडं बहुजन ओढले गेले. त्यानंतर पुढे पुन्हा वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन झालं. पण, खर्या अर्थानं धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक क्रांती केली ती भागवत धर्मानं. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा धर्म, असाच भागवत धर्माचा उल्लेख करावा लागेल. बौद्ध-जैनांमधील अहिंसा, शाकाहार, दयाक्षमाशांतीच्या तत्त्वज्ञानाला, सोप्या आचरणपद्धतीला एका बाजूनं उजाळा देत दुसरीकडं वैदिकांनी स्वीकारलेल्या वैष्णव पंथाचा अवलंबही भागवत धर्मीयांनी केला.
तेराव्या शतकानंतर खर्या अर्थानं पारमार्थिक वाट दाखवली ती भागवत-वारकरी धर्मानं. सर्वांशी भावनिक बंध असलेल्या, सर्वांना सखा वाटणार्या विठ्ठलाच्या उपासनेकडं हा बहुजनवर्ग ओढला गेला. आत्तापर्यंतच्या दैवतकल्पना या शस्त्रं हाती घेतलेल्या, युद्ध करणार्या, बहुभुजाधारी अशा होत्या. या अनेको दैवतांपेक्षा वेगळी विठ्ठलमूर्ती वारकरी संप्रदायात आहे. हाती शस्त्र नाहीच; पण ते हात कंबरेवर ठेवलेली शांत, सात्त्विक, अहिंसेचं महत्त्व अधोरेखित करणारी अशी सर्वांगसुंदर मूर्ती पंढरपूरच्या विठ्ठलाची आहे.
कर्मकांडाला येत गेलेलं अनाठायी महत्त्व वारकरी-भागवत धर्मानं कमी केलं. मांसाहार वर्ज्य करावा, मद्यपान करू नये, गळ्यात तुळशी माळ घालावी, कपाळी टिळा लावावा, एकादशीला उपवास करावा आणि सर्वांचं कल्याण व्हावं, अशी ’सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामया’ वृत्ती बाळगावी एवढीच ढोबळ आचारसंहिता या धर्मानं आखली. ती सर्वसामान्यांना आपले व्यवहार सांभाळत पार पाडणं सहजशक्य होतं. भागवत धर्माची वेशभूषाही विशिष्ट रंगांच्या कपड्यांशी संबंधित नव्हती. संतांच्या रचनांच्या पुस्तकांपेक्षा ते पाठ करण्यावर म्हणजेच मौखिक परंपरेवर भर देण्यात आला.
त्यामुळेच अशिक्षित वारकरीही शेकडो अभंग म्हणतात. मराठमंडळातील गरीब तसेच शोषित वर्गाशी, अविकसित अर्थव्यवस्थेशी ती निगडित होती. त्यामुळे खर्चीक यात्रांना फाटा देऊन वारीचा अवलंब करण्यात आला आणि तोही पायी वारीचा. चातुर्वर्ण्याच्या कालबाह्य रूढीपेक्षा समता, बंधुता ही तत्त्वे पुरोगामी, कालसुसंगत ठरली.
इस्लामी धर्मप्रसाराचा रेटाही या भागवत धर्मानं मागे हटवला तसेच सनातनी ब्राह्मण्यालाही प्रभावहीन केलं. त्यामुळेच कष्टकरी, तत्कालीन मागास मानल्या गेलेल्या जातींमधूनही गोरा कुंभार, नामदेव, चोखा मेळा, बंका महार, नरहरी सोनार, संत जनाबाई, विसोबा खेचर, सावता माळी आदी अनेको संत पुढे आले. वेदांची महती आपल्यालाच माहिती असल्याच्या दर्पौक्तीला तुकारामांनी ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा’ असं खणखणीत उत्तर दिलं.
भागवत धर्मानं वैदिक-हिंदू धर्मापेक्षा साधी-सोपी आचारसंहिता अवलंबली, तरी त्या देशभर रुजलेल्या तत्त्वज्ञानाशी फटकून वागण्याची वृत्ती मात्र ठेवली नाही. उलट त्यानं त्यातील अनेक भाग आपलेसे केले. त्यानं महाकाव्ये, पुराणे, धर्मग्रंथ, महापुरुषांची चरित्रं आदी वैदिक आणि आठव्या-नवव्या शतकापासून ज्याचा उल्लेख हिंदू म्हणून करण्यात येऊ लागला, अशा धर्मातील भागांचा सढळ हातानं वापर केला.
त्यांच्यातील मूळ सहिष्णुवृत्तीमुळेच हे शक्य झालं. परिणामी, विशाल अशा हिंदू धर्माशी संलग्न असाच भागवत धर्म झाला. विशेषत: कीर्तन या वारकरी संप्रदायातील प्रकारामध्ये त्याचा विशेष प्रत्यय येतो. आपलं दिवसभराचं काम झाल्यावर गावातील मंदिरात किंवा पटांगणात कष्टकरीवर्ग कीर्तनात रमून गेलेला दिसून येतो. रंजनाबरोबरच धार्मिकता जपण्याची, एकमेकांत मिसळण्याची संधी त्यांना मिळते. ...अशा या भागवत धर्माचं विशाल दर्शन वारीमध्ये घडतं. समाजातील दीन-दलितांना, कष्टकर्यांना सामावून घेण्याची ताकद त्यातून दिसून येते. वारी हा अनुभवण्याचा सोहळा आहे.
वारी हे महाराष्ट्राच्या व्यापक समाजजीवनाचं जितंजागतं दर्शन आहे. वारी हे महाराष्ट्रदेशाच्या एकात्मतेचं सुंदर प्रतीक आहे. वरकरणी विविध जाती-जमातींत विभागल्या गेलेल्या समाजपुरुषाचं एकात्म मन वारीतून प्रकट होतं. ‘जो जे वांछिल ते तो लाहो’ म्हणणार्या ज्ञानदेवांपासून ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ म्हणणार्या नामदेवांपर्यंतच्या सर्वांमधून भागवत धर्माची सहिष्णुता, करुणा, भक्ती, प्रेम वारीतून प्रकर्षानं जाणवते.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ म्हणत जातीपातींचे बंधन दूर करत अन् एकमेकांच्या पाया पडत लाखो महाराष्ट्रजन जेव्हा देहभान विसरून वाळवंटी नाचू लागतात तेव्हा परब्रह्माचं दर्शन घडतं. आषाढी एकादशीच्या दिवशी सारा महाराष्ट्र तनानं नसला, तरी मनानं भूलोकीच्या वैकुंठीमध्ये म्हणजे पंढरपुरात असतो.
आषाढी एकादशीला पंढरपुराला पोचायची आस घेऊन काही लाख वारकरी आळंदी-देहूला पोहचतात. तिथून पंढरपूरकडं ज्ञानोबा-तुकोब्बांच्या पालख्या वाट चालत असताना मोठ्या नदीला जसे ओढे येऊन मिळतात तसे गावोगावचे भागवतधर्मी त्यांच्यात सहभागी होतात आणि शेवटी पंढरपुरात ही नदी विशाल सागराचं रूप घेतं. वारीचा हा प्रवास जसा रोमांचक अनुभव देतो, तसाच अनेक थक्क करणार्या गोष्टीही शिकवतो.
शाळेतील एखाद्या वर्गातील पन्नास मुलांना मैदानावर रांगेनं उभं करायचं म्हटलं तर दोन-तीन शिक्षकांना घसाफोड करावी लागते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसारख्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांचा मोठा ताफा लागतो. पण, वारीमध्ये वाहतूक आणि गावोगावच्या भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेसाठी लागणार्या पोलिस बळाखेरीज वारीच्या व्यवस्थापनाचे काम त्यांना अभावानंच करावं लागतं. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी खूप काही शिकावं असं वारीत बरंच काही असतं. पहाट झाली की एका इशार्यासरशी गावभर विखुरलेले वारकरी आपापल्या दिंडीची जागा घेतात.
काहींच्या हाती टाळ असतात, काहींच्या डोई तुळशीवृंदावन असतं, तर काहींच्या डोई विठ्ठलाची छोटीशी मूर्ती. विणेकर्याची वीणा झंकारत असते. विठ्ठलनामाचा गजर करत, अभंग म्हणत एका लयीत हा मेळा पुढे चालू लागतो. प्रत्येक दिंडीतील वारकर्यांची नोंदणी दिंडीप्रमुखाकडून होते. या दिंडीच्या ट्रकमध्ये वारकर्यांचे कपडे आणि अन्य सामान असतं. दिंडी चालू लागायच्या आधीच तो ट्रक पुढच्या मुक्कामाला रवाना होतो.
पुढचा मुक्काम गाठला की आचारी स्वयंपाक करून तयार राहतात. गावोगावचे भाविक वारकर्यांच्या भोजनाची, फळवाटपाची व्यवस्था करीत असले, तरी दिंडीतील वारकर्यांचं सुग्रास जेवण त्यांच्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी तयार असतं. अनेक दिंड्यांबरोबर पाण्याचे छोटे टँकरही असल्याचं दिसून येतं. काही मुक्कामांतील जेवणाचा मेन्यूही आधीच ठरलेला असतो. कुठंही रांग मोडणं नाही, दिंडीकर्यांची चेंगराचेंगरी नाही. ही शिस्त नेमकी येते कुठून?
वर्षभर आपापल्या कामात व्यग्र असलेल्या वारकर्यांना ज्येष्ठात आस लागते ती वारीची. पडणार्या पावसाची तमा ते बाळगत नाहीत, दिवसभर चालण्याचं-प्रसंगी चिंब भिजण्याचं कष्ट त्यांना जाणवत नाही. त्यांच्या चेहर्यावर वैताग नव्हे, तर प्रसन्नभाव असतो. ते वेगळ्याच विश्वात असतात, वेगळ्याच आनंदात असतात. दिवसभर चालूनही मुक्कामाच्या रात्री वेगवेगळ्या मंदिरांमधल्या, मैदानावरल्या भजन-कीर्तनात ते रमून जातात.
पंढरपूरच्या आधीचा मुक्काम असतो वाखरीचा. वाखरीहून निघालेले वारकरी जवळपास धावतच विठुरायाच्या नगरीत आतुरतेनं प्रवेशतात आणि आजच्या एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटी संत गोळा होत हरिकीर्तनात रंगून जातात. आजच्या जगात बरेच जण आपल्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स किंवा गिनीज बुकमध्ये व्हावी, यांसाठी प्रयत्न करताना दिसतात.
परंतु, आषाढी वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी अशा क्रमासाठी सहभागी होत नाहीत तर मनाने, स्वखुशीनं पांडुरंगाच्या, संत तुकाराम-ज्ञानदेवांच्या प्रती असलेल्या भावपूर्ण भक्तीनं सहभागी होतात. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंतचे सर्व मराठमंडळ वारीत येतं, गेल्या काही वर्षांपासून तर आयटीयन्सचीही दिंडी येते आहे. ही आस नेमकी येते कुठून? उत्तर निश्चित मिळेल; पण ज्ञानदेव ज्याप्रमाणे म्हणतात ’एक तरी ओवी अनुभवावी’ त्याप्रमाणे एकतरी वारी अनुभवली तरच..!