गरज पाण्याचा अपव्यय थांबविण्याची | पुढारी

गरज पाण्याचा अपव्यय थांबविण्याची

विकास मेश्राम, पाणीप्रश्नाचे अभ्यासक

‘हर घर जल’सारख्या योजना असूनही सरकारी कागदपत्रांचे अहवाल मान्य करतात की, भारतातील सुमारे 360 जिल्ह्यांत आता पाण्याचे संकट कायम आहे. एकीकडे वाढता उष्मा, तर दुसरीकडे वाढती तहान आणि शेतासाठी अधिक पाण्याची गरज, यासोबतच पावसाळ्याचे दिवस वर्षानुवर्षे कमी होत आहेत. पाणी कारखान्यात निर्माण होऊ शकत नसल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही आपली जबाबदारी बनली आहे.

पाणी हा जीवनाचा आधार आहे. सर्व मानव, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि जीवाणू यांच्या जीवनचक्रात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनादि काळापासून आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक धार्मिकतेमध्ये याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. बहुतेक संस्कृती पाण्याजवळ विकसित झाल्या आहेत. हे मानवतेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाशी आणि निरोगी इकोसिस्टीमशी खोलवर जोडलेले आहे. पाण्याचा वापर हा समाज आणि पर्यावरण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. संयुक्त राष्ट्रांच्या मते, पाणी मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे; परंतु जगभरातील लाखो लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे, ज्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण केवळ 3 टक्के आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ 0.3 टक्का पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. पाणी हा शेतीचाही एक अपरिहार्य भाग आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात सिंचन, कीटकनाशके, मत्स्यपालन आणि पशुधनासाठी स्वच्छ पाण्याची अधिक गरज आहे. यासोबतच बदलत्या कृषी धोरणांसह संकरित बियाण्यांची उपलब्धता आणि वाढत्या व्यापारीकरणामुळे पिकांना सिंचनासाठी खते, कीटकनाशके आणि अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. प्रबळ शेतकर्‍याला सिंचनासाठी नेहमीच पाणी उपलब्ध होते; परंतु लहान शेतकर्‍याला नेहमीच त्याची कमतरता भासत आहे. औद्योगिक विकास आणि कृषी विकासामुळे या मौल्यवान नैसर्गिक साधनसंपत्तीची मागणी आणि वापर वाढला आहे, त्याचबरोबर त्याच्या बेधुंद वापरामुळे त्याचा दर्जा घसरला आहे आणि प्रदूषणही वाढले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधनात चार वर्षांपूर्वीच इशारा दिला आहे की, 2030 पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 0.5 ते 1.2 अंश सेल्सिअसची वाढ होणे अपरिहार्य आहे. आता एक बाब जाणून घेणे गरजेचे आहे, तापमानात एक अंश वाढ म्हणजे शेतात प्रतिहेक्टर 360 किलो पीक कमी होणे. अशा प्रकारे, हवामान बदलामुळे 310 जिल्हे कृषी द़ृष्टिकोनातून संवेदनशील मानले गेले आहेत. यापैकी 109 जिल्हे अत्यंत संवेदनशील आहेत, जेथे येत्या दशकातच पशू संपत्तीपासून ते कुक्कुटपालन आणि मत्स्य उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. हे संकट केवळ पाण्याचे नाही. खरे संकट जलव्यवस्थापनाचे आहे, हे स्पष्ट होते.

या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वापरासाठी विविध प्रकारच्या पाण्याची वर्गवारी कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागात हे समजावून सांगणे गरजेचे आहे की, भूगर्भातून काढले जाणारे पाणी अमर्याद नाही आणि ते एकदा संपले की, परत येत नाही; पण खरी समस्या म्हणजे पूर्वजांनी बांधलेले तलाव, विहिरी किंवा नद्यांची दुरवस्था. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा ही शिकवण पूर्वजांकडून मिळाली; पण आपण लक्षातच घेतली नाही, हा कळीचा प्रश्न आहे. पावसाचा काही भाग बाष्पीभवन होऊन, तर काही समुद्रात जातो. आपण विसरतो की, निसर्ग जीवन देणारी संसाधने म्हणजेच पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो आणि हे चक्र सतत सुरू ठेवणे आपली जबाबदारी आहे. हे चक्र थांबणे म्हणजे जीवन थांबणे होय. निसर्गाच्या खजिन्यातून आपण जे काही पाणी घेतो, ते आपल्याला परत करावे लागते.

पाण्याच्या गैरवापराबाबत एकच नाही, तर अनेक धक्कादायक तथ्ये आहेत, ज्यांना जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटेल की, आपल्याकडे थोडेही पाणी शिल्लक नाही. काही तथ्ये पुढीलप्रमाणे- मुंबईत दररोज 50 लाख लिटर पाणी वाहने धुण्यासाठी खर्च होते. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये पाईपलाईनमधील व्हॉल्व्ह निकामी झाल्यामुळे दररोज 17 ते 44 टक्के पाणी वाया जाते. ब्रह्मपुत्रा नदीतून दररोज 2.16 घनमीटर पाणी बंगालच्या उपसागरात जाते. दरवर्षी भारतात पुरामुळे हजारो मृत्यू आणि कोट्यवधीचे नुकसान होते. देशात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज सरासरी साडेपाच किलोमीटर पायपीट करावी लागते, हेसुद्धा कटू सत्य आहे.

दरवर्षी जगात 22 लाख लोकांचा जलजन्य आजारांमुळे मृत्यू होतो. संपूर्ण पृथ्वीवर एक अब्ज 40 घन किलोलिटर पाणी आहे. यातील 97.5 टक्के पाणी खारट समुद्रात आहे, तर उर्वरित 1.5 टक्का पाणी ध—ुवीय प्रदेशात बर्फाच्या रूपात आहे. उर्वरित एक टक्का पाणी नद्या, तलाव, विहिरी, धबधबे आणि तलावांमध्ये आहे, जे पिण्यास योग्य आहे. यापैकी 60 टक्के पाणी शेती आणि उद्योगांमध्ये वापरले जाते. उरलेला चाळिसावा भाग आपण पिणे, स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्यात घालवतो. ब्रश करताना नळ उघडा ठेवल्यास पाच मिनिटांत सुमारे 25 ते 30 लिटर पाणी वाया जाते. बाथटबमध्ये आंघोळ करताना श्रीमंतवर्ग 300 ते 500 लिटर पाणी गटारात वाया घालवतो. आंघोळीत 100 ते 150 लिटर पाणी वाया घालवणारा मध्यमवर्गही यात मागे नाही.

समाजात पाण्याचा अपव्यय करण्याची राजेशाही प्रवृत्ती आहे, ज्याला आळा घालण्यासाठी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पाण्याची बचत आणि किफायतशीर वापर यावर आताच काम केले नाही, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचविण्यासारख्या शासनाच्या योजना पाण्याच्या स्रोतांअभावी निरुपयोगी ठरतील.

Back to top button