कृषी क्रांतीची अग्रदूत ‘नमो ड्रोन दीदी’ योजना
सशक्त आणि विकसित राष्ट्राच्या उभारणीच्या प्रक्रियेत महिला सक्षमीकरण हा बिनदिक्कतपणे एक महत्त्वाचा घटक आहे. स्त्रिया आर्थिकद़ृष्ट्या समृद्ध होतात आणि त्या माध्यमातून ग्रामीण समृद्धीत स्वतःचे योगदान देतात त्यावेळी खर्या अर्थाने सशक्त आणि विकसित राष्ट्र उभारणीचा उद्देश पूर्णत्वाला जातो. हीच बाब लक्षात घेऊन 30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधताना नमो ड्रोन दीदी या उपक्रमाची घोषणा केली. 15 हजार महिला बचत गटांना शेतीसाठी भाड्याने देण्यासाठी ड्रोन प्रदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण समृद्धीचे नवे युग सुरू करता यावे, यासाठी आणि ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करता यावे म्हणून नवतंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याचे हे एक सर्वोत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल. ग्रामीण भागातील महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करून, कृषी पद्धतींचे आधुनिकीकरण करणे आणि त्याचवेळी कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे हे उद्देश नमो ड्रोन या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच प्रभावीपणे पूर्ण होतील. यामुळे ग्रामीण भागातील महिला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील आणि नव्या कृषी क्रांतीचे नेतृत्वही त्यांच्या हाती येऊ शकेल. इतकेच नाही, तर या योजनेमुळे देशातल्या चैतन्याने भारलेल्या युवा वर्गासाठीही नव्या संधींची दारे खुली होऊ शकणार आहेत. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यासारख्या नव्या नावीन्यपूर्ण द्रव खतांच्या उदयामुळे कार्यक्षम फर्टिगेशन प्रणाली या सिंचन प्रक्रियेद्वारे पिकांना खते देण्याची आधुनिक पद्धत विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाहिले तर बचत गटांतील महिला पायलटच्या हाती ड्रोन तंत्रज्ञान सोपवण्याची ही अभिनव कल्पना केवळ पंतप्रधानांनाच सुचू शकते आणि तेच ती अमलातही आणू शकतात.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा खतांचा उत्पादक देश आहे. त्याचवेळी आपला देश खतांचा दुसरा सर्वात मोठा आयातदारही आहे. कारण, आपल्याकडे वायू इंधन, फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खनिजांसारख्या नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता अपुरी आहे. आयातीवरील हे अवलंबित्व दूर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने खतांचे बंद पडलेले अनेक कारखाने पुनरुज्जीवित केले आहेत आणि त्यासोबतच आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत खतांचा नवा विभाग स्थापन करायलाही चालना दिली आहे. केंद्र सरकारने उचललेल्या या पावलांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या किमतीतील अस्थिरतेच्या फटक्यापासून भारतीय शेतकरी निश्चितच बचावला आहे. दुसरीकडे खतांसाठी अनुदानाच्या माध्यमातून खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यातही सरकार यशस्वी ठरले आहे.
कोरोना महामारी आणि अलीकडील जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रासमोर मोठी नवी आव्हाने उभी राहिली आहेत. या परिस्थितीमुळे जगभरात आजवर कधी नव्हत्या एवढ्या प्रमाणात खतांच्या किमतींमध्ये वाढ झाली; पण आपल्या सरकारने मात्र या आव्हानांचेही संधीत रूपांतर करण्याचा मानस केला. त्याच अनुषंगाने पर्यायी खतांच्या विकासासाठी सरकारने स्वदेशी संशोधनाला प्रोत्साहन दिले. यामुळेच तर आपल्याकडे द्रवरूप नॅनो खताची निर्मिती होऊ शकली. दुसरीकडे या सगळ्याच्या जोडीला फर्टिगेशन प्रणाली विकसित करणे हे आव्हानही समोर होते आणि त्या आव्हानावर मात करण्याच्या प्रक्रियेतूनच आपण उदयोन्मुख ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करू शकलो.
किसान-ड्रोनच्या उदयामुळे कृषी पद्धतीत क्रांती घडवून आणण्याच्या नव्या आणि असंख्य संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. हाताला बांधलेल्या पंपांद्वारे कीटकनाशके आणि द्रव खतांची फवारणी करण्याची पारंपरिक पद्धत वेळखाऊ तसेच किचकटही आहेच; पण हे करताना जोडीला सरपटणारे विषारी प्राणी आणि शेतात लपून बसलेल्या वन्यप्राण्यांपासूनचा धोकासुद्धा जोडलेला आहे; पण कृषी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी पद्धतीचे स्वयंचलित पद्धतीचे यांत्रिकीकरण केल्याने वेळेची बचत तर होतेच, त्यासोबतच फवारणीची कार्यक्षम प्रणालीसुद्धा वापरात आणता येते. या सगळ्यामुळे किसान ड्रोनची जी गरज आपण निर्माण करू शकलो आहोत, त्यामुळे स्टार्टअप्स क्षेत्रातील युवावर्गाला त्यांच्या आकांक्षा पूर्ण करू शकणार्या संधींचे नवे दालनही खुले झाले आहे. ड्रोननिर्मिती उपक्रमामुळे देशातील युवावर्गासाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या नव्या क्षेत्रामुळे ग्रामीण महिला पायलट, मेकॅनिक आणि सुट्या भागांचा व्यवसाय करणार्यांसाठीदेखील रोजगाराच्या आणि उत्कर्षाच्या नव्या संधी निर्माण होणार
आहेत.
‘विकसित भारत’ हा उपक्रम असो किंवा विकसित भारताचे स्वप्न असो, हे उद्देश साध्य करण्यासाठी महिला सक्षमीकरण ही पूर्वअट आहे, असे माझे ठाम मत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नमो ड्रोन दीदी या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि या संधींच्या माध्यमातूनच त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनतील. महत्त्वाचे म्हणजे यामुळे आपली कृषीप्रधान कुटुंबसंस्कृती अधिक समतामूलक आणि बळकट व्हायलाही मोठी मदतच होणार आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर कृषी उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात महिला ड्रोन पायलट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. कीटकनाशके आणि द्रव खतांची ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करायला सुरुवात केल्याने शेतकर्यांची शारीरिक कष्ट आणि त्रासापासून सूटका तर होणारच आहे, शिवाय त्यासोबतच अधिक त्यांचा वाचलेला वेळ त्यांना अधिक उत्पादनक्षम कामासाठी वापरता येणार आहे.
नमो ड्रोन दीदी योजना सध्याच्या परिस्थितीचा कायापालट करणारी ठरेल, हे नक्की! या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल. या योजनेमुळे ग्रामीण महिला आर्थिक घडामोडी आणि ग्रामीण समृद्धीच्या केंद्रस्थानी येऊ शकतील. त्यातूनच अनेक समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणेही शक्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेमुळेच आपण सध्या एकाच छताखाली कृषी सेवा पुरविणार्या पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्रांचे जाळे उभे करू शकलो आहोत आणि ही योजना याच परिघातून राबवली जाणार आहे. त्यामुळेच ही योजना अगदी स्वाभाविकपणे आपल्यासारख्या मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान देशामधील आधुनिक युगातील कृषी क्रांती आणि समृद्धीची अग्रदूत ठरेल, यात मला कोणतीच शंका वाटत नाही.