लवंगी मिरची : तुम्ही रडा, आम्हीही रडतो!

लवंगी मिरची : तुम्ही रडा, आम्हीही रडतो!

राजस्थान विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. साहजिकच गेली पाच वर्षे सत्ता भोगलेल्या आमदारांना जनतेसमोर जावे लागत आहे. 'भरसभेत ढसाढसा रडले आमदार' अशी काहीशी बातमी राजस्थानमधून आली आहे. म्हणजे झाले असे की, काँग्रेसची प्रचार सभा होती. काँग्रेस उमेदवार अमरसिंह जाटव बोलत होते. मंचावर येऊन त्यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले म्हणे! काय सांगितले माहिती नाही; पण भाषण क्षणभर थांबले. कार्यकर्त्याने कानात बोललेले शब्द थेट जाटव यांच्या डोळ्यांमधून अश्रूरूपाने वाहू लागले. त्यांना हुंदका आला आणि ते ढसाढसा रडू लागले.

यानंतर संबंधित आमदार, मला आई-वडील नाहीत, असे म्हणाले. शिवाय ते पुढे असेही म्हणाले की, माझ्यामागे आता फक्त लोकांचा आशीर्वाद आहे. लोकांच्या भावनेला साद घालत ते पुढे म्हणाले की, मी जोवर जगेल याच माझ्या मतदार बंधू-भगिनींसाठीच जगेन. या बातमीत असे म्हटले आहे की, सदरहू आमदार हे सचिन पायलट गटाचे आहेत. त्यांनी याच ठिकाणी सचिन पायलट यांची साथ कधीही सोडणार नाही, असेही जाहीर केले. नंतर ते काही क्षण माईक सोडून जमिनीवर बसले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जाटव यांना धीर दिला. स्वतःच्या डोक्यावरची पगडी काढून त्यांच्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर जाटव थोडे हसले म्हणे आणि पुन्हा रडले म्हणे! नंतरच्या त्यांच्या संपूर्ण भाषणाला हुंदक्यांची साथ होती. त्यांचे हे भावपूर्ण भाषण बहुधा ठरल्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्याने चित्रित केले आणि एका दिवसात ते सर्वत्र व्हायरल झाले.

निवडणूक काळात अशा अनेक गमती-जमती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भोळीभाबडी जनता बिचारी पुन्हा एकदा भुलून उमेदवाराला निवडून देते आणि त्यानंतर आमदार पुन्हा हसत असतात आणि जनता मात्र पाच वर्षे रडत असते. निवडणुकांच्या तोंडावर रडणे हे आमदारांना शोभत असले, तरी गेली पाच वर्षे जनतेचे अश्रू पुसण्यासाठी कोण आले होते, याचा शोध कधीतरी भारतीय जनमानसाला घ्यावा लागेल. सातत्याने निवडून येणार्‍या आमदारांचे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सादर केलेले संपत्तीचे विवरणपत्र पाहिले, तर कोणाही आमदाराची संपत्ती मागील निवडणुकीपेक्षा कमी झाली आहे, असे उदाहरण आपल्या देशात सापडू शकत नाही. म्हणजे मागील निवडणुकीच्या वेळेला संपत्ती 75 कोटी असेल, तर पाच वर्षांमध्ये सदर आमदारने स्वतःची प्रगती साधलेली असते. कोटीच्या कोटी उड्डाणे करत 75 वरून 200 कोटींवर झेप घेणार्‍या आमदारांना रडण्याची गरजच काय?

म्हणजे जनतेला वार्‍यावर सोडून देऊन आमदारच रडत असतील, तर जनतेने आपले अश्रू घेऊन जावे तरी कुठे? मुकी बिचारी कुणीही हाका, हे मान्य करून सर्वसामान्य जनता कर्तव्याचा भाग म्हणून कुणाला ना कुणाला तरी निवडून देते आणि मग रडण्याची वेळ जनतेवर येते आणि आमदार महोदय पाच वर्षे विकट हास्य करत असतात. निवडणुकांच्या तोंडावर रडल्याचे नाटक करून जनतेच्या भावनांना साद घालून एकदा अश्रू ढाळले आणि निवडून आले की, पुढे पाच वर्षे रडण्याची कामगिरी जनतेला पार पाडायला लावणार्‍या लोकशाहीचे दुष्टचक्र कधी, कुठे आणि कसे थांबणार आणि ते कोण थांबवणार, हा एक मोठाच प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news