Israel Hamas War : इस्रायल युद्धाचा धडा | पुढारी

Israel Hamas War : इस्रायल युद्धाचा धडा

- हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

जीवित व वित्तहानीसह अन्य दूरगामी प्रतिकूल परिणामांचा विचार करता, कोणतेही युद्ध समर्थनीय कधीच नसते; परंतु प्रत्येक युद्धातून काही धडे मिळत असतात. हे धडे बचावात्मक उपाय योजनांबरोबरच भविष्यात आपल्याला अशा युद्ध संघर्षाला सामोरे जाण्याची वेळ आल्यास, आपली तयारी कशी असली पाहिजे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धातूनही भारताला भविष्यातील संघर्षासाठी आणि शांततेसाठी अनेक गोष्टी शिकता येण्याजोग्या आहेत.

हमास या संघटनेने इस्रायल या संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षवेधी क्रांती केलेल्या आणि प्रतिबंधात्मक युद्धनीतीमध्ये माहीर असलेल्या राष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे खिंडार पाडत नृशंस हल्ला केला. भारतात 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखी मोडस ऑपरेंडी असणार्‍या या हल्ल्याची भयावहता कैकपटींनी अधिक होती. यानंतर प्रक्षुब्ध होऊन इस्रायलने थेट युद्धाची ललकारी दिली आणि तेव्हापासून गाझापट्टीवर भयंकर संघर्षाची सुरुवात झाली. वास्तविक पाहता, इस्रायलचे ‘अँटी मिसाईल शिल्ड आयन डोम’ हे मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्रांना थांबवू शकत होते; मात्र त्याचे रक्षण करण्यासाठी तिथे पायदळ नसल्यामुळे हमासने बुलडोझर्स, थ—ी व्हीलर्सच्या मदतीने आयन डोमला बरबाद करून इस्रायलमध्ये प्रवेश केला.

लढाईदरम्यान प्रमाणात सोशल मीडियाचा गैरवापर करून दुष्प्रचार आणि अपप्रचार युद्ध सुरू असते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फारच मेहनत करावी लागेल. भारतविरोधी दुष्प्रचार करणार्‍यांना आपण ओळखले पाहिजे. त्यांना ब्लॉक केल्यास जास्त प्रभावी होऊ शकते. यामुळे दुष्प्रचार देशात पसरू शकणार नाही. आपल्याला चिनी आणि पाकिस्तानी सोशल मीडियामध्ये घुसखोरी करून, तिथे माहितीयुद्ध जिंकण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. लोकशाही देशांना कायद्याच्या युद्धासाठी तयार राहावे लागते. अमेरिकेच्या संस्था, अन्य देश वेगवेगळ्या पद्धतीने कायद्याचा दबाव लढणार्‍या देशावर आणतात. असे सांगतात की, तुम्ही जे युद्ध लढत आहात ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय कायदे हे दहशतवादी संघटना किंवा देश जिथे लोकशाही नाही (चीन आणि पाकिस्तान) यांना लागू नाहीत. म्हणून कायदा युद्धाचा अभ्यास करून, त्यावर वेळोवेळी योग्य प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी मोटराईज पॅराग्लाईडसचा यशस्वी वापर केला, अशा बातम्या आहेत. या पद्धतीचा भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर यांचा कसा उपयोग होऊ शकतो, याचा अभ्यास केला जाणे गरजेचे आहे.

बदलत्या काळात भारतीय सैन्यानेसुद्धा अर्बन युद्धाची, भुयाराच्या आतील युद्धाची तयारी करणे आवश्यक आहे. रशियन सैन्य शहराच्या आत जाऊन अर्बन युद्ध करण्यास तयार नव्हते म्हणूनच त्यांना लढाईमध्ये यश मिळत नाही. मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांचा वापर युद्धभूमीवर फारच वाढलेला आहे. ही शस्त्रे आता दहशतवादी गटांकडेही आहेत. म्हणून क्षेपणास्त्रापासून, ड्रोन्सपासून आपले रक्षण करण्यासाठी अँटी ड्रोन किंवा अँटी मिसाईल सिस्टीम तयार करणे गरजेचे आहे. इस्रायलची आयन डोमपद्धती मिसाईल थांबविण्यामध्ये 90 टक्के यशस्वी ठरली आहे. मात्र, ही अँटी मिसाईल सिस्टीम खर्चिक आहे म्हणून लेझर किरणांच्या मदतीने संरक्षण विकसित करणे भारतीय सैन्याला गरजेचे आहे. भुयारांचा वापर यशस्वी पद्धतीने अमेरिकेच्या विरुद्ध लढताना व्हिएतनामने केला होता, ज्यात त्यांना पुष्कळ यश मिळाले होते. याशिवाय तोराबोरामध्ये अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन यानेही भुयाराचा वापर करून स्वतःचे रक्षण केले होते. सद्दाम हुसेनने भुयाराचा वापर केला होता. हमासने केलेला भुयाराचा वापर हा एक संशोधनाचा मोठा विषय आहे. चीनने भारत सीमेवर भुयारे तयार केली आहेत. अशी भुयारे भारतीय परिस्थितीमध्ये शत्रू कसा वापरू शकतो, यावर अभ्यास केला जाणे गरजेचे आहे.

Back to top button