लवंगी मिरची : जो करेल तो निभावेल!

लवंगी मिरची : जो करेल तो निभावेल!
Published on
Updated on

ही आसाम मधली बातमी वाचलीस का मित्रा? आसाम सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना विवाहविषयक नवीन एक नियम घालून दिला आहे. समजा, एखाद्या कर्मचार्‍याला दुसरे लग्न करायचे असेल तर सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक केले आहे. तसे पाहिले, तर आधीच सरकारी कर्मचारी आपल्या पाठीशी असलेल्या कामामुळे संत्रस्त असतो. तो कशाला दुसर्‍या लग्नाच्या भानगडीत पडेल? आणि समजा पडणार असेल, तर यात सरकारला विचारण्यासारखे काय आहे? मलातरी समजलेले नाही.

हे बघ, सर्वसामान्य कर्मचार्‍याच्या आयुष्यात एक लग्न व्यवस्थित होऊन संसार चांगला पार पडला तरी पुष्कळ झाले असे असते. लग्न करावे, मुलेबाळे मोठी करावीत, त्यांच्या आयुष्याचा गाडा मार्गी लावावा आणि सेवानिवृत्त होऊन उर्वरित आयुष्य शांततेत काढावे, एवढीच त्याची अपेक्षा असते. पण काहीही म्हण, दुसरे लग्न ही कल्पनाच किती रोमँटिक आहे, नाही? समजा, एखाद्याचे बायकोबरोबर पटत नसेल आणि नेमका त्याच्यासमोर एखादा प्रस्ताव आला आणि त्याने दुसरे लग्न केले, तर सरकारला काय करायचे आहे? जो करेल तो निभावेल. ज्याच्या मध्ये असे दुसरे लग्न निभावण्याची ताकद आहे असेच लोक दुसर्‍या लग्नाच्या फंदात पडतील.

अरे तसे नाही. शासनाचे म्हणणे असे आहे की, दोन लग्न केलेल्या कर्मचार्‍याचा जर समजा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम कोणाला द्यायची, यावरून वाद होतात. पहिल्या लग्नाची बायको ही कायदेशीर आणि त्याची वारसदार असते. पण समजा, दुसरे लग्न केलेले शासनाला माहीत नसेल, तर दुसरी पत्नी सरकारी कार्यालयात येऊन पतीचा वारसाहक्क मागू शकते आणि ही रक्कम आपल्यालाच मिळावी यावरून वाद होऊ शकतात, असे शासनाचे म्हणणे आहे. बरं, मला एक सांग, समजा एखादा कर्मचारी दुसरे लग्न करण्याची परवानगी शासनाला मागत असेल तर ती शासन देणार आहे की नाही? की इथेपण त्या बिचार्‍याच्या आयुष्यात मिठाचा खडाच टाकणार आहे? एखाद्याचा पहिल्या लग्नाचा प्रयोग फसला असेल तर दुसरा यशस्वी होऊ शकतो. पण मग परवानगीचा काय प्रश्न उभा राहील? आणि समजा, शासनाने परवानगी दिली नाही आणि त्या बिचार्‍याचे दुसर्‍या होणार्‍या बायकोवर अधिक प्रेम असेल, तर त्याने काय करायचे?

हे बघ, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुणी कर्मचारी दुसरा लग्न करतो आहे हे शासनापासूनच काय, आपल्या पहिल्या बायकोपासून आणि मुलांपासूनपण लपवून ठेवत असतो. अशी कुणी परवानगी जर मागितली तर शासन त्याला शपथपत्र मागेल की, समजा माझे काही बरेवाईट झाले तर माझा वारसदार म्हणून मिळणार्‍या शासकीय रकमेवर पहिल्या पत्नीचा अधिकार असेल की दुसर्‍या पत्नीचा अधिकार असेल? असे शपथपत्र घेऊन ठेवल्यास शासनाला नंतर कुठलाही प्रश्न पडणार नाही.

समजा, एखाद्या कर्मचार्‍याने दुसरे लग्न केले याचा अर्थ, त्याचे पहिल्या पत्नीवरचे प्रेम संपले असा होत नाही. कदाचित काही बरेवाईट झाले तर दोघींनाही समान वाटा द्या, असे शपथपत्र तो देऊ शकतो. पण काहीही झाले तरी शासकीय नियम असतात त्याप्रमाणेच काम करावे लागते. आसाम शासनाच्या या निर्णयामध्ये पूर्वपरवानगी न घेता दुसरे लग्न केले, तर त्या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचा अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवून घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news