आषाढी एकादशी : येई पंढरीनाथा भेटावया! | पुढारी

आषाढी एकादशी : येई पंढरीनाथा भेटावया!

- प्रा. म. रा. जोशी, संत वाङ्मय संशोधक

जेथे भक्त असतात तेथे श्री विठ्ठल असतो. तो भक्तांच्या मागोमाग जाणारा देव आहे. परब—ह्म हे एक नाणे आहे. त्याची एक बाजू भक्तजन आहे, तर दुसरी बाजू श्री विठ्ठल आहे. विठ्ठलाच्या नामघोषात भक्त देहभान विसरतात आणि आनंदाने नाचू लागतात. जेथे जेथे भक्त असतात तेथे तेथे त्यांच्या संगती विठ्ठल राहतो. भक्तांची सोबत हे विठ्ठलाचे सुख आहे, तर देवाचे दर्शन हा भक्तांचा संतोष आहे. म्हणूनच वारकरी पंढरपूरची वारी करतात. ही वारी हरिदिनी म्हणजे, एकादशीला असते. आज (गुरुवार) आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने…

गोष्ट आहे, ज्येष्ठ आणि हा अष्टमी शके 1734 (इ.स. 1832) मधील. आरफळकर, तासकर आणि खान्देशचे निष्ठावंत वारकरी खंडोजी बुवा आणि शिरवळकर या वारकर्‍यांची. ज्ञानदेव महाराजांच्या आदेशाप्रमाणे, द़ृष्टांताप्रमाणे आरफळकर आळंदीला ज्ञानदेव मंदिरात आले. चौघांनी माऊलीला साष्टांग नमस्कार घातला. आरफळकारांनी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाचा नामघोष केला. ज्ञानदेव, तुकारामांचा नामघोष केला. माऊलींच्या पादुका शिरावर घेतल्या. प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल म्हणत चौघांनी पंढरीची वाट धरली. या क्षणापासून पालखीला प्रारंभ झाला. आरफळकर, शिरवळकर, तासकर, खंडोजी बुवा पंढरपूरला निघाले. दिंडी-दिंडींतून गावोगावीचे, विदर्भाचे आणि कोकणचे, आंध्राचे आणि कर्नाटकाचे वारकरी पंढरपूरला, आषाढी एकादशीला नामसंकीर्तन करीत नामघोष करीत जाऊ लागले. एकादशीव्रतस्थ विठ्ठलभक्त विष्णुशयनोत्सवासाठी पंढरपूरला येऊ लागले. व्यक्तिशः दिंडी-दिंडी रूपाने, आपापल्या फडासह वारकरी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. वारकर्‍यांचे, विठ्ठलभक्तांचे पंढरपूरला येणे ही एक अखंड क्रिया आहे. या प्रक्रियेला प्रारंभ आहे; पण शेवट नाही, अशी ही वारकर्‍यांची दिशा आहे.

वारकर्‍यांच्या दिंडीला, वारीला प्रारंभ झाला तो द्वारकेहून. कृष्णदेव हे दिंडीरवनात आहेत. म्हणून रुक्मिणी दिंडीरवनात द्वारकेहून निघाली. तिच्या मागोमाग गोकुळामधून गोपवृंद आले. राधा आली. रुक्मिणी, राधा, गोपवृंद-गोपाल कृष्णदर्शनासाठी पंढरपूरला आले. येेथे कृष्ण विठ्ठल रूपात आहे. ज्या स्थानी कृष्ण विठ्ठल रूपात आला ते स्थान दिंडीश शिवाचे होते. येथे शिव दिंडीश नावाने यति, योगी, जनात प्रसिद्ध होता. दिंडीश हा शब्द, हे नाव कर्नाटकातील शिलालेखातही आढळते. दिंडीश, दिंडीरवन आणि दिंडी ही तिन्ही नावे वारकरी संप्रदायात, विठ्ठलभक्तवर्गात प्रसिद्ध आहेत.

हा दिंडीश शिव पांडुरंग नावानेही प्रसिद्ध आहे. पांडुरंग नावावरून पंडरगे हे ग्रामनाम कन्नड भाषेत आणि शिलालेखांत प्रसिद्ध झाले. पंडरगे विठ्ठल असा पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख शके 1159 शिलालेखात येतो. हा लेख संस्कृत, कन्नड भाषेत असून, पंढरपूर मंदिरावर कोरण्यात आला. या लेखात कर्नाटकाचा राजा वीर सोमेश्वर पंढरपूरला वारीसाठी आला होता, असा उल्लेख आहे. याच लेखात पुंडलिकाचाही उल्लेख आहे. येथून आपणाला तीन-चार शिलालेख मिळू लागतात. त्यामधून नामदेव-ज्ञानदेव आणि पूर्वकालांतील वारकरी, फड आणि वारकरी संप्रदायाची माहिती मिळते. या महितीचा मागोवा घेत घेत आपण गेलो की, शके 450 पर्यंत येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य भारत, आंध—, गुजरात, कोकण, विदर्भात विठ्ठलाची पूजा होत होती, हे ताम—पटातून व शिलालेखांवरून कळून चुकते आणि ज्ञानदेवपूर्व काळातील विठ्ठलभक्त आपल्याला भेटू लागतात. आपल्याला ज्ञानदेव-तुकाराम आणि तुकारामोत्तर आजपर्यंतचा वारकरी संप्रदाय माहीत आहे; पण पुंडलिक, ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांच्या कालखंडातील वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे स्वरूप समजण्यासाठी ताम्रपट आणि शिलालेख मदत करतात. तसेच पुराणांचे ही साहाय्य होते.

स्कंद आणि देवी भागवत पुराणातून पंढरपूरचे पुंडलिकाचे उल्लेख आलेले आहेत. स्कंदपुराणात 12 अध्यायांचे पंढरी माहात्म्य आहे. तथापि, ही तिन्ही बरीच प्राचीन आहेत. प्राचीन पुराणात ज्याची गणना होते, असे मत्स्यपुराण आहे. या पुराणात पंढरपूरचा उल्लेख लोहदंड तीर्थक्षेत्र पुंडरिकपूर असा येतो. मत्स्यपुराणाचा काल. इ.स. 500-600 आहे. या पुराणात येणारा पुंडरिकपूर हा पंढरपूरचा आणि भक्तराज पुंडलिकाचा उल्लेख हेच स्पष्ट करतो की, शके 422 मध्ये पुंडरिकाची पुराण परंपरा पसरलेली होती. याच पुराणात पांडुरंगपल्लीचा ताम्रपट आहे. हा ताम्रपट आणि मत्स्यपुराणाच्या अभ्यासावरून पुंडलिक महाराजांचा कालखंड आणि त्यांची भक्तराज म्हणून कीर्ती शके 350-400 मध्ये सर्वत्र पसरली होती आणि ज्ञानदेव-नामदेवांपूर्वी भक्तराज पुंडलिक एक हजार वर्षांपूर्वी होऊन गेले. तेव्हापासून विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी विटेवर उभा आहे.

आषाढीला श्रीहरीच्या दर्शनार्थ आलेले वारकरी तासन्तास उभे राहून हळूहळू पुढे सरकतात. महाद्वारात आले की, नामदेवाची पायरी लागते. नामदेवाला वंदन करून महाद्वारातून गरुडस्तंभाकडे चालू लागतात. याच गरुडस्तंभाचा आश्रय घेऊन तुकाराम महाराजांनी अभंगातून श्री विठ्ठलाचे स्तुतिस्त्रोत गायले आहे. कर कटावरी तुळशीच्या माळा। ऐसे रूप डोळा दावी हरी। ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा। कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली ऐसी मूर्ती? गरूड पारावरी उभा राहिलासी, आठवे

मानसी तेचि रूप? झुरोनी पांजरा होऊ आहे आता। येई पंढरीनाथा भेटावया। तुका म्हणे माझी पुरवावी आस। विनंती उदास करू नये।

भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठल रूपाने भीमातीरावर पंढरपुरी प्रकट झाले. त्यावेळी श्री विठ्ठलाची शोभा दिव्य होती. समवेत रुक्मिणी देवी व राधा होत्या. प्रगट झालेले भगवंत विटेवर उभे होते. दोन्ही हात कंबरेवर ठेवले होते. समचरण होते व द़ृष्टी नासाग्रावर होती. भगवान विठ्ठल हे श्रीकांत होते. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर होते. वर्ण मेघाप्रमाणे नील होता. त्यांचे स्तवन देव आपल्या मधुरवाणीने करत होते. तसेच सर्व भक्त अष्टसात्त्विक भाव जागृत झाल्याने पुलकित होऊन श्री विठ्ठलाचे संकीर्तनात मग्न झाले होते. तर सर्व श्रुती त्याच्या अखंड स्तवनात तन्मय झाल्या असतानाच सर्वसिद्ध पुढे सरसावले व तेही त्यात सामील झाले. तेव्हा ब्रह्मसाक्षात्कारी ज्ञानी मागे कसे राहतील? तेही मोठ्या संतोषाने भगवंताचे श्री विठ्ठलाचे स्तुतिस्त्रोत गाऊ लागले, असा हा भक्तजनप्रिय श्री विठ्ठल आहे.

Back to top button