पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट | पुढारी

पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांना एक वर्षाहून कमी कालावधी उरला असताना पक्षाचे नेते सचिन पायलट यांनी सुरू केलेली प्रचार मोहीम चर्चेचा विषय बनली असून, पक्षात दाखवले जाते तसे सगळे काही आलबेल नसल्याचेच चित्र त्यावरून समोर येते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पायलट यांचे असलेले मतभेद वारंवार समोर आले असून, सध्याच्या प्रचार मोहिमेवरून ते पुन्हा एकदा ऐरणीवर आले. कोणत्याही नेत्याने पक्ष प्रचार किंवा संघटना बांधणीसाठी प्रचार मोहीम राबविण्यामध्ये गैर नाही; परंतु पक्षशिस्तीच्या चौकटीतच त्याचे वर्तन असावे लागते. मात्र, पायलट यांनी ही प्रचारमोहीम पक्षाच्या नेतृत्वाशी विचार विनिमय न करता जाहीर केल्यामुळे त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारच्या विरोधातील एखाद्या प्रश्नावर सरकारमधील नेताच रस्त्यावर आला आहे. पायलट यांनी अलीकडेच शिक्षकांच्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिला होता.

यावरून त्यांची बंडखोर भूमिकाच अधिक ठळकपणे पुढे येते. ‘कधी प्रश्नपत्रिका फुटतात, कधी परीक्षा रद्द होतात हे सगळे वेदनादायी आणि त्रासदायक आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यावरून होणार्‍या त्रासाची कल्पना करता येत नाही,’ अशा शब्दांत पायलट यांनी सरकारला आणि पर्यायाने मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना लक्ष्य केले. राजकीय निरीक्षकांकडून पायलट यांच्या प्रचारदौर्‍याचे अनेक अर्थ काढले जात असताना पायलट यांचे समर्थक मात्र त्यांचा हा दौरा पक्षाच्या मजबुतीसाठी असल्याचा दावा करताहेत. पायलट यांच्या या दौर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राज्यातील जाट आणि शेतकरीबहुल प्रदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. राजस्थानच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा होती; परंतु ती तोडून गेल्यावेळी काँग्रेसने सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळवली आणि आता तिसर्‍यांदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.

पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमधील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसताना तिथे कशी काय सत्ता मिळणार? कारण पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद मिटवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने अनेकदा प्रयत्न केले. पक्षनेतृत्वाने दिलेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळावा, यासाठी पायलट प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि पायलट यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू न देण्यासाठी गेहलोत राजकीय डावपेच खेळतात. याचा फटका पक्ष संघटनेला बसताना दिसतो. आताच्या पायलट यांच्या प्रचार मोहिमेला गेहलोत कसे प्रत्युत्तर देतात किंवा पक्षनेतृत्व काय प्रतिक्रिया देते, यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुका सुरू असताना आणि राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानात येण्याच्या तोंडावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांच्यावर जहरी टीका केली होती. ‘एक गद्दार कधीही मुख्यमंत्री बनू शकत नाही. ज्याने पक्षाविरुद्ध बंड केले, पक्षाला धोका दिला त्याला पक्षश्रेष्ठी कधीही मुख्यमंत्रिपदी बसविणार नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी पायलट यांच्यावर हल्ला केला होता.

त्यातही योगायोग असा की, ‘भारत जोडो यात्रा’ मध्यप्रदेशात असताना पायलट यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला, त्याचवेळी गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका केली होती. अनुभवी नेते असलेल्या गेहलोत यांच्याकडून प्रगल्भ वर्तनाची अपेक्षा असताना एखाद्या उथळ नेत्यासारखी त्यांनी आपली भडास बाहेर काढली होती. त्यावेळी पायलट मात्र आपल्यावरील तीव— हल्ल्यानंतरही शांत राहून पक्षनेतृत्वाच्या सूचनेचे पालन करताना दिसत होते. गेहलोत आणि पायलट यांच्यातील हा सत्तासंघर्ष कोणत्या वळणाने जाणार आणि त्याचा शेवट कशामध्ये होणार आहे, याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही.

राजस्थान विधानसभेच्या 2018च्या निवडणूक काळात काँग्रेस नेतृत्वाने पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता; परंतु गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या आग्रहामुळे नेतृत्वाला माघार घ्यावी लागली आणि पायलट यांची समजूत काढून त्यांना काही दिवस थांबण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपशी संगनमत करून तेथील काँग्रेसचे सरकार सत्तेवरून खाली खेचले. त्याचवेळी पायलट हेही शिंदे यांच्या मार्गाने जाणार असल्याची चर्चा होती. 2020 मध्ये पायलट यांनी बंड करून तो अंदाज खरा ठरवला होता. समर्थक 19 आमदारांना घेऊन ते दिल्लीजवळील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये थांबले होते.

पक्षनेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर माघार घेऊन त्यावेळी ते पुन्हा सत्तेत सहभागी झाले होते. त्या बंडाची खोलवर जखम गेहलोत यांच्या मनावर झाली असून, त्यांनी ती वेळोवेळी उघड केली आहे. बंड केले तेव्हा पायलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पक्षाच्या अध्यक्षाने पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे, असे गेहलोत म्हणतात ते त्यामुळेच. गेहलोत यांनी त्यापुढे जाऊन, पायलट यांच्या बंडाला भारतीय जनता पक्षाने अर्थपुरवठा केल्याचा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते त्यात सहभागी असल्याचाही आरोप केला होता.

गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित झाले तेव्हा आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदीही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते; परंतु ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणानुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावर राहता येणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांचे नाव मुख्यमंत्रिपदी येऊ नये, यासाठी मोर्चेबांधणी केली होती. हा वाद अनेक वळणे घेत वाढतच चालला आहे, हे विशेष! सतत सत्तेत राहिल्याचा हा परिणाम असावा. त्याच्याशी पक्षनेतृत्वाला फारसे देणे-घेणे दिसत नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नव्याने उफाळलेला संघर्ष काँग्रेसला कुठे घेऊन जाणार, हा मोठा प्रश्न आहे.

Back to top button