संकटमोचक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | पुढारी

संकटमोचक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अरविंद सावंत, खासदार

मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची…

ही काव्यपंक्ती शोभेल असे आजच्या राजकारणातले व्यक्तिमत्त्व म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देहावसान झाले आणि त्यानंतर शिवसेनेचे काय होईल, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. एक मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व शिवसेनेच्या शीर्षपदी आल्यामुळे त्याला राजकारणात सहजगत्या गुंडाळता येईल, अशी भाकितेही अनेकांनी केली. पण, यानंतर 15 दिवसांनी उद्धव ठाकरे एक वाक्य बोलले, ङ्गआता रडायचे नाही, आता लढायचे. त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घालण्यास सुरुवात केली. माँ साहेबांच्या स्वभावामुळे उद्धवजींमध्ये करुणेचा भाग मूलतःच आहे. पण याचजोडीला शिवसेनाप्रमुखांचा कणखरपणाही त्यांच्यात आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आजारपणाच्या काळात राज ठाकरे, नारायण राणे शिवसेना सोडून गेले; पण तेव्हाही उद्धव यांनी संघटनेकडे ज्यापद्धतीने पाहिले, लक्ष दिले आणि ज्या धीरोदात्तपणे उभे राहिले त्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती झाली. दिल्लीत कारभार सुरू झाला; परंतु महाराष्ट्रात मात्र शिवसेनाप्रमुख नाहीत, याचा फायदा घेऊ, असा विचार भाजपने केला आणि खडसेंना पुढे करून युती तोडली. कालांतराने पुन्हा आम्ही एकत्र आलो, पण दोन्हीही सरकारांमध्ये शिवसेनेला ज्यापद्धतीने वागवले जात होते, त्याचा बारकाईने अभ्यास उद्धव ठाकरे करत होते. त्यांचा स्वभाव शिवसेनाप्रमुखांसारखा नाही. त्यामुळे ते फारसे प्रतिक्रिया देत नव्हते. केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला नगण्य समजले जात होते. शिवसेना त्यामागून फरफटत चाललीय असा प्रकार सुरू होता. याची खूप मोठी किंमत पक्षाला द्यावी लागत होती, पण शेतकर्‍यांचा प्रश्न जेव्हा बिकट बनला तेव्हा उद्धव आग्रह धरत राहिले की शेतकर्‍यांना कर्जमुक्ती द्या; पण शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेे टाळाटाळ करत राहिले. उद्धवजींनी ङ्गआम्ही रस्त्यावर उतरूफ असे सांगितले आणि प्रत्यक्षात उतरलेही. स्वतःच्याच सरकारच्या विरोधात! तेव्हा सरकारला झुकावे लागले; पण त्याहीवेळी कर्जमुक्ती न करता कर्जमाफी केली. शेतकर्‍याला कर्जाच्या विळख्यातून मुक्त केलेच पाहिजे, हा विचार त्यांनी दिला.

संबंधित बातम्या

उद्धवजी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ङ्गमी मुंबईकरफ. काय होती ही संकल्पना? उद्धवजींचे म्हणणे होते की, जी माणसे भलेही जन्माने मुंबईकर नसतील; पण त्यांचा मुंबईच्या जडणघडणीला, उभारणीला हातभार लागलेला आहे- मग तो कोणत्याही जातिधर्माचा का असेना- त्याला ही मुंबई आपली वाटली पाहिजे. हा त्यामागचा विचार होता. हा लढा कुठल्याही परप्रांतीयांविरोधात नव्हता. मुंबईवर तिच्या क्षमतेपेक्षा अधिक बोजा टाकला जात असताना त्यासंदर्भात जेव्हा शिवसेना उभी राहते तेव्हा या सर्वांनी ङ्गमुंबईकरफ म्हणून उभे राहिले पाहिजे आणि मुंबई वाचवली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आज लक्षात येते की, उद्धव यांची ती भूमिका सर्व पक्षांनी स्वीकारली असती तर मुंबईचे चित्र आज निश्चितपणाने वेगळे असते.

रामदास आठवलेंना उद्धवजींनी शिवसेनेसोबत आणले. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती तयार होईल, असे त्यांचे म्हणणे होते. 2019 च्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेचे एक महाशिबिर गोरेगावला झाले. तेव्हा त्यांनी आवाज दिला, ङ्गहोय, युतीमध्ये आमची 25 वर्षे सडली आणि आता आम्ही यांच्यासोबत जाणार नाही. आम्ही एकाकी लढणार.2012 मध्ये साहेब गेल्यानंतर 2014 मध्ये लोकसभेला आम्ही भाजपसोबत एकत्र लोकसभा लढलो; पण विधानसभेला युती तोडली. त्यावेळी त्यांना असे वाटले की उद्धवजी एकटे काय करणार! रामदास आठवले, महादेव जानकर यांनीही शिवसेनेची साथ सोडली होती; पण एकट्याच्या जीवावर उद्धवजींनी 63 आमदार निवडून आणले. मुंबई महानगरपालिका जिंकून दाखवली.

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीचे वातावरण आठवून पाहा. संबंध देशभरातील माध्यमांनी, विश्लेषकांनी पुन्हा मोदींचे सरकार येणे कठीण असल्याचे किंवा आले तरी काठावरच्या बहुमताने येईल, असे सांगण्यास सुरुवात केली होती. त्या भीतीपोटी अमित शहा मातोश्रीवर आले. ङ्गजो हो गया सो हो गयाफ म्हणत सेनेला गळ घातली. उद्धवजींनी अमित शहांनी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढलो आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात सत्तापदांचे 50-50 टक्के वाटप होईल, असे आश्वासन दिले होते, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आजही त्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहेत. उद्धवजींनी दिलदारपणा दाखवला; पण यांनी काय केले? एकत्र लढलो तेव्हा पोलिसांचा कयास होता की सेनेच्या 85-90 जागा येतील. पण बरोबर राहून भाजपने पाठीत खंजिर खुपसल्याने आमचा आकडा 56 वर गेला. सावंतवाडीत दीपक केसरकरांचा पराभव झाला, हे एक उदाहरण पुरेसे आहे.

शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. काँग्रेस पक्ष सोबत आला आणि महाविकास आघाडी उभी राहिली. सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्या भाषणात उद्धव यांनी दाखवून दिले की हिंदुत्व कशाला म्हणतात! मुख्यमंत्री होताच उद्धवजी अयोध्येला गेले आणि आम्ही विचारधारा सोडलेली नाही. आज उद्धव ठाकरे अतिशय सुंदरपणाने राज्यकारभार करत आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. समाजाप्रती असणारे कर्तव्य म्हणून, दिलेला शब्द पाळायचा, वचनपूर्ती म्हणून मी हे काम केले, असे ते सांगतात.

सरकार स्थापनेनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आले. महाराष्ट्रात संक्रमणाचा आकडा वाढला; पण त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राने काही लपवले नाही. खोटे अहवाल सादर केले नाहीत. उलट या ऐतिहासिक संकटाविरोधात उद्धवजी निर्धाराने उभे राहिले. ते देशातील एकमेव मुख्यमंत्री ठरले ज्यांनी फिल्ड हॉस्पिटल उभी केली. महाराष्ट्रात टेस्टिंग लॅबोरेटरी जेमतेम चार-पाच होत्या, त्यांनी ही संख्या 700 वर नेली. महाराष्ट्रात नावाजलेल्या डॉक्टरांचा टास्कफोर्स उभा केला. कोरोनाच्या संकटावर अत्यंत सूक्ष्मपणाने त्यांनी लक्ष ठेवले आणि महाराष्ट्राला यातून सावरले. निर्बंधांबाबत कुणी कितीही टीका केली तरी माणसे जगवणे हे माझे पहिले प्रथम कर्तव्य आहे, असे सांगत निर्भयपणाने ते पार पाडले. तरीही संकटाची साखळी संपली नाही. चक्रीवादळे आली, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली; पण धीरोदात्तपणाने उद्धव ठाकरे जनतेच्या पाठीशी उभे राहिले. पंतप्रधान आणि परदेशातील राष्ट्रांनीही महाराष्ट्राचे कौतुक केले. किंबहुना, मुंबईतील उपाययोजनांची ही कार्यपद्धती आहे तिचे अनुकरण करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याहून उद्धव यांच्या कार्याची आणखी कोणती पावती हवी?

यापूर्वी संकटांमध्ये काय मदत करायची याची नियमावली ठरवली जायची, पण उद्धव यांनी नियमांपलीकडे जाऊन मदत देण्याचे धोरण स्वीकारले आणि ते पारदर्शीपणाने अमलात आणले. असे हे संकमोचक उद्धवजी. संकटकाळात असा मुख्यमंत्री राज्याला लाभणे हे सद्भाग्य आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

Back to top button