राजमाता जिजाऊ : क्रांतिकारक, शूर, मुत्सद्दी राजमाता | पुढारी

राजमाता जिजाऊ : क्रांतिकारक, शूर, मुत्सद्दी राजमाता

राजमाता जिजाऊ या प्रयत्नवादी होत्या. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त…

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंच्या हत्या झाल्या. खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयांत जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जीवे मारण्यासाठी अफझलखान आला. पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदर तह, राज्याभिषेक, राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेबांनी अनुभवले; कठीण प्रसंगी त्या कधीही डगमगून गेल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही. संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत. याउलट संकटाला संधी समजून त्यावर त्यांनी यशस्वी मात केली. जिजाऊ संकटसमयी लढणार्‍या होत्या. रडणार्‍या नव्हत्या.

राजमाता जिजाऊ कणखर निर्भीड, हिम्मतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली.

पती निधनानंतर सती न जाता त्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी स्वत:ला झोकून दिले. सतीप्रथेसारख्या अमानुष प्रथेला लाथाडणार्‍या जिजाऊ ‘क्रांतिकारक महामाता’ आहेत. त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या, म्हणूनच अशी हिंमत करू शकल्या.
मुरार जगदेवने ज्या पुण्यावर गाढवांचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते, त्याच पुण्यात बाल शिवबाला सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवून त्यांनी भूमिपुत्रांत अभय निर्माण केले. जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणार्‍या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. त्या भाबड्या किंवा प्रवाहपतित नव्हत्या.

जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरिबांप्रती अत्यंत कारुण्यमूर्ती होत्या. त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. चौदा वर्षांच्या शिवबाला मांडीवर बसवून महिलांवर अत्याचार करणार्‍या रांझे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुले यांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला. आपले राज्य नीतीमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बेहरखडे येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही, याची काळजी जिजाऊंनी घेतली.

जिजाऊंची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोहोच केली. जिजाऊ स्वत: युद्धकलेत निपूण होत्या. घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या. लढवय्या होत्या. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि लढाऊ वृत्तीचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणार्‍या समकालीन कवींद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात केले आहे. ते पुढीलप्रमाणे- ‘राजगडावर राहणारी शिवाजीची माता जिजाऊ आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली.’ (शिवभारत अध्याय 26/5)
प्रदीर्घ काळ शिवाजीराजे पन्हाळा वेढ्यात अडकले असताना जिजाऊ स्वत: शिवबाची सुटका करण्यासाठी निघतात. त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद करतो- ‘त्या माझ्या पुत्रास (शिवाजीस) स्वत: सोडविण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन.’ (शिवभारत, अध्याय 26/14) यावरून स्पष्ट होते की, कठीण काळात त्या हतबल होऊन रडत बसल्या नाहीत, तर शस्त्र घेऊन रणांगण गाजविण्यास तत्पर असत. केवळ शहाजीराजांच्या महाराणी, शिवबांच्या माता, शंभूराजांच्या आजी एवढी त्यांची मर्यादित ओळख नाही, तर त्या स्वत:च महान योद्धा, शूर, मुत्सदी, धैर्यशाली राजनीतीज्ञ होत्या.

शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. स्वराज्याची इंचभर भूमीदेखील शत्रूला जिंकू दिली नाही. राज्यात कधीही भेदभाव केला नाही. मावळ्यांवर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात नीतीमूल्यांची जोपासना केली. ध्येयवाद आणि आत्मविश्वास निर्माण केला.

समकालीन डच दप्तरात जिजाऊंच्या योगदानाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे- ‘शिवाजी महाराजांच्या मातोश्री जरी सुमारे 80 वर्षांच्या होत्या, तरी त्या राज्याभिषेक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आल्या. त्यानंतर बारा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. जिजाऊंनी स्वत:जवळील 25 लाख पॅगोडे शिवरायांना स्वराज्यासाठी सुपूर्त केले.’ सर्व काही रयतेच्या स्वराज्यासाठी त्यांनी समर्पित केले. त्यामुळेच शाहीर अमर शेख जिजाऊंच्या योगदानाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात,

‘आला आला शिवाजी आला॥
योग्य समयाला। जिजाईन दिला॥
थोर त्या मातेचे उपकार।
मराठ्यांनो तुमच्याने नाही फिटणार।’

तर, महात्मा फुले म्हणतात, ‘ज्यांची मातोश्रीच युद्धकला, राजनीतीमध्ये निष्णात आहे, त्या शिवरायांना कोणत्याही बाह्यगुरूंची गरजच नव्हती.’

राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचे, व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन समकालीन परमानंद, जयराम पिंडे यांनी केले आहे. परमानंद म्हणतात, ‘शहाजीराजांची महाराणी जिजाऊ म्हणजे विजयलक्षणा, कमलनेत्रा, यशस्विनी, विजयवर्धिनी अशी जाधवरावांची कन्या आहे.’ जिजाऊ विजयवर्धिनी म्हणजे विजय खेचून आणणार्‍या यशस्विनी होत्या. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची सावली होत्या. दूरदृष्टीच्या होत्या. याबाबतचे वर्णन शहाजीराजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे ‘राधामाधव विलासचंपू’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे करतो.

जशी चंपकेशी खुले फुल जाई।
भली शौभली ज्यास जाया जिजाई॥
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला॥

जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडविले, तसेच शंभूराजांनादेखील घडविले. स्त्रीदेखील पुरुषांप्रमाणेच हिम्मतवान, बुद्धिवान, कर्तृत्वान, पराक्रमी, शूर, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हेच स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब!

– डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

Back to top button