

नागपूर;पुढारी वृत्तसेवा: यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने 1 लाख शाखापर्यंत विस्ताराचे लक्ष्य आहे. तसेच या निमित्ताने 15 ते 17 मार्च असे तीन दिवस रेशीमबागेत चालणाऱ्या अखिल भारतीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा, अनेक प्रस्ताव आणि संघकार्याची आणि विशेषतः संघ शाखांची समीक्षा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांच्यासह अखिल भारतीय सह प्रचार प्रमुखद्वय नरेंद्र कुमार आणि आलोककुमार उपस्थित होते. (RSS Nagpur News)
वर्ष 2018 नंतर प्रतिनिधी सभेची बैठक जवळपास सहा वर्षानंतर नागपूरला होत आहे. या बैठकीला देशभरातून 1529 प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीमध्ये भाजप,विहिपसह संघ प्रेरित 36 संघटना आणि काही समूहांचा सहभाग राहील. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय प्रमुख संचालिका शांताक्का जी, विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार इत्यादी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. बैठकीमध्ये उपस्थित सर्व संघटना देशामध्ये चालणारे विविध कार्य, समस्या व त्यांचे समाधान याबद्दल प्रतिनिधी सभेच्या बैठकीला माहिती देतील व यावर चर्चा सुद्धा होईल, असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले. (RSS Nagpur News)
22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ऐतिहासिक असून, भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये या संदर्भात सुद्धा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच या बैठकीमध्ये नव्या सरकार्यवाह यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल व सरसंघचालक,सरकार्यवाह यांच्या देशभरातील प्रवासाची योजना सुद्धा निश्चित होईल. त्याचबरोबर समाज हितासाठी पंच परिवर्तनावर बैठकीत व्यापक चिंतन होईल. पंच परिवर्तनामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित व्यवस्था व नागरिक कर्तव्य यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. (RSS Nagpur News)
हे वर्ष अहिल्याबाई होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने संघाकडून या बैठकीमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहे. मे 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान ही जन्म त्रिशताब्दी साजरी केली जाणार आहे. यासोबतच या प्रतिनिधी सभेमध्ये नवीन अभ्यासक्रम असलेल्या संघ शिक्षा वर्गांची सुद्धा चर्चा अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.