

वल्लभनगर: गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वल्लभनगर येथील सौ. भाग्यश्रीताई पी. डी. पाटील भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याने पूर्णपणे तुंबल्याने प्रशासनाने तो वाहतुकीसाठी तातडीने बंद केला आहे. याचा थेट फटका मुंबई, ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससेवेला बसला असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
भुयारी मार्ग बंद असल्यामुळे मुंबईहून येणाऱ्या एसटी बसेसना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वळसा घालून वल्लभनगर आगारात प्रवेश करावा लागत आहे. तसेच आगारातून बाहेर पडताना बसना नाशिक फाटामार्गे अतिरिक्त वळसा घेऊन पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ व्हावे लागत आहे. या बदललेल्या मार्गामुळे बससेवेचा वेळ विस्कळीत झाला असून, वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.
अतिरिक्त फेऱ्यांमुळे ठाणे, पनवेल आणि मुंबईकडे जाणाऱ्या मोजक्याच बसेस वल्लभनगर आगारात येत असल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भुयारी मार्गातील पाण्याचा तातडीने उपसा करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसेस सध्या पिंपरी चौकाला वळसा घालून वल्लभनगर बसस्थानकात प्रवेश करत आहेत. दरड कोसळल्यामुळे दोन दिवस वाहतूक बंद होती. आता बससेवा पुन्हा सुरू झाली आहे; मात्र मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसेसची संख्या सध्या कमी आहे.
पल्लवी पाटील, आगार प्रमुख