वडगाव मावळ: शेती गेली एमआयडीसीच्या हाती, समधं गेलं चोरांच्या हाती, म्हातारी लागली मारायला रे... जागा नाय तिला जाळायला..! अशा प्रकारचे भावनिक गाणे म्हणत बधलवाडी, मिंडेवाडी येथील एका वयोवृद्ध आजीबाईसह ग्रामस्थांनी आज वडगाव मावळ येथे स्मशानभूमीसाठी उपोषण सुरू केले.
बधलवाडी, मिंडेवाडी येथील स्मशानभूमी एमआयडीसीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाडून टाकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थानी रविवारी (दि. 15) बधलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये निषेध सभा घेतली. या वेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी सोमवारपासून वडगाव मावळ येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज वडगाव मावळ येथे पंचायत समिती समोरील चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केले.
तत्पूर्वी श्री पोटोबा महाराज मंदिरापासून भजन पथकासह प्रतिकात्मक प्रेताची अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध व्यक्त केला. या वेळी माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी दाभाडे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र कडलक, प्रशांत भागवत, रवींद्र शेटे, श्रीकृष्ण भेगडे, तानाजी पडवळ, पंडित दहातोंडे, दिनकर शेटे, नवनाथ पडवळ, काळूराम दहातोंडे, अनिल बधाले, अरविंद बधाले, गुलाब बधाले आदी उपस्थित होते.
नायब तहसीलदारांना दिले निवेदन
एमआयडीसीने शेकडो एकर जमीन संपादित करुन कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली, परंतु स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सुविधा दिलेल्या नाहीत. तसेच, स्मशानभूमी पडल्याने अंत्यसंस्कारासाठी गैरसोय झाली आहे. विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थानी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणाचा विस्तार करताना नेहमीच ग्रामस्थांना उपेक्षित ठेवले आहे. एकीकडे मोठंमोठ्या कंपन्यांना आधुनिक सुविधा द्यायच्या आणि दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्रांना मात्र मूलभूत गरजांपासून दूर ठेवायचे, असा खेळ एमआयडीसी करत आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ स्मशानभूमी बांधावी.
शांताराम कदम, माजी उपसभापती
आम्ही आज प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आहे, शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ स्मशानभूमी बांधावी. अन्यथा यानंतर कोणाचे निधन झाले तर आम्ही खरीखुरी अंत्ययात्रा इथे आणू आणि इथेच अंत्यविधी करू. शासनाने व एमआयडीसीने आमचा अंत पाहू नये.
दिनकर शेटे, स्थानिक शेतकरी