

महेश भागिवंत
नवलाख उंबरे: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिस व नागरिक यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी हाती घेतलेली गाव दत्तक योजना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या उपक्रमामुळे पोलिस व ग्रामस्थ यांच्यातील दरी कमी होऊन परस्पर विश्वासाचे नवे नाते निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, या योजनेचा परिणाम गावातील गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली लक्षणीय घट दर्शवत आहे. मागील वर्षी 277 गुन्हे घडले होते. या योजनेमुळे यावर्षी गुन्ह्यांमध्ये घट झाली असून, 155 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच, संबंधितांवर तत्काळ कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. (Latest Pimpri News)
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पोलिसांनी आपल्या हद्दीतील गावांना दत्तक घेतले आहे. प्रत्येक गावासाठी एक जबाबदार अंमलदार नियुक्त करण्यात आलेला असून, तो गावाशी नियमित संवाद साधतो, समस्यांची माहिती घेतात व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना घटनेच्या अनुषंगाने माहिती कळवून त्याचे निराकरण केले जाते. यामुळे गावकर्यांना थेट पोलिसांशी संवाद साधता येत असल्याने त्यांच्यात पोलिसांबद्दलचा अविश्वास कमी होत चालला आहे.
नागरिकांना मार्गदर्शन
या योजनेअंतर्गत ग्रामसभांमध्ये पोलिस अधिकारी हजर राहत असून, ते स्थानिक नागरिकांना गुन्हेगारी, सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार, अमलीपदार्थांचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तरुणांना कायद्याचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. काही गावांमध्ये महिला दक्षता समित्याही स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांच्या मदतीने महिलांच्या समस्या अधिक प्रभावीपणे हाताळल्या जात आहेत.
चोरींच्या घटनांना लगाम
गावदत्तक योजनेचा सकारात्मक परिणाम म्हणून अनेक गावांमध्ये चोरी, मारामारी, घरगुती हिंसाचार यासारख्या घटनांमध्ये स्पष्ट घट झाली आहे. काही गावांमध्ये गेले कित्येक महिने एकही गुन्हा नोंदवलेला नाही, ही या योजनेची मोठी उपलब्धी मानली जात आहे. पोलिसांच्या या सृजनशील उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि आत्मविश्वासाचा भाव वाढत आहे. स्थानिक ग्रामस्थही या योजनेचे कौतूक करत आहेत.
गावात पोलिस अधिकार्यांचे नियमित येणं-जाणं आणि त्यांच्या सल्ल्यामुळे गावातील वातावरण सकारात्मक झाले आहे, असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, गुन्हेगारीविरोधी लढ्यात हे एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. पोलिस आणि जनतेत निर्माण होणारा विश्वास आणि सहकार्याचे बंध या योजनेमुळे अधिक घट्ट होत आहेत, हेच खरे यश मानावे लागेल.
पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद वाढणे ही काळाची गरज आहे. गाव दत्तक योजनेमुळे आम्हाला नागरिकांशी थेट जोडता येते आणि त्यांच्या अडचणी वेळेत समजून घेता येतात. यामुळे गुन्हेगारी टाळणे शक्य झाले आहे.
- रणजीत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलिस
आमच्या गावात पोलिस येतात. गावातील महिला, वृद्ध आणि समित्यांशी चर्चा करतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. तसेच, यावर योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करतात. त्यामुळे आम्हीही आमच्या समस्या मोकळेपणाने मांडतो.
- दत्तात्रय पडवळ, माजी सरपंच
रात्री गस्त वाढली आहे, त्यामुळे शेतमाल चोरीचे प्रकार थांबले आहेत. आम्हाला आता पोलिसांची साथ असल्यासारखं वाटतं.
- एकनाथ शेटे, माजी उपसरपंच