

पिंपरी: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या प्रतीक्षा यादीत आकुर्डी आणि पिंपरी केंद्रांमध्ये मिळून ११५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, संधी मिळूनही तब्बल ७८ पालकांनी प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांशी संपर्क साधला नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही केंद्रांतील सर्व जागा भरल्या असल्या, तरी मोठ्या प्रमाणावर पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
आकुर्डी केंद्रांतर्गत ११५ शाळांमध्ये एकूण १२६ जागा उपलब्ध होत्या. यापैकी ७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर पाच अर्ज नाकारण्यात आले. तब्बल ४९ पालकांनी शाळांशी संपर्क साधला नसल्याने त्यांची नोंद 'नॉट अॅप्रोच'मध्ये झाली.
पिंपरी केंद्रात ६४ शाळांमधील ७४ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी ४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. दोन अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले, तर २९ पालकांनी प्रवेशासाठी संपर्क साधला नाही.आरटीईअंतर्गत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध असूनही प्रतीक्षा यादीत नाव येऊनही अनेक पालकांनी प्रवेशासाठी पुढाकार घेतला नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत विलंब होत आहे.