

पिंपरी: गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थित राहावी आणि समाजविघातक घटकांवर पोलिसांचा धाक निर्माण व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्यापक तयारी केली आहे. शहरातील तब्बल 1,809 समाजकंटकांवर विविध कायद्यांखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन, गस्त व नाकाबंदीची कडक अंमलबजावणी आणि मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था
गणेशोत्सव काळात महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी दोन अधिकारी व 100 होमगार्डचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या सातव्या व अकराव्या दिवशी 38 मिरवणूक मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. (Latest Pimpri News)
3,000 हून अधिक फौजफाटा
शांतता व सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. यात 1 पोलिस सहआयुक्त, 1 अपर पोलिस आयुक्त, 6 पोलिस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलिस आयुक्त, 64 पोलिस निरीक्षक, 291 उपनिरीक्षक/सहायक निरीक्षक, 2,355 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड, 2 एसआरपीएफ प्लाटून, 1 बीडीडीएस पथक, 17 स्ट्रायकिंग फोर्स आणि 6 आरसीपी प्लाटून यांचा समावेश आहे.
लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध
पोलिस उपायुक्त, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळीय पोलिस उपायुक्त यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती, डीजे चालक/मालक आणि सरकारी विभागांच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतल्या आहेत. 23 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 नुसार लेझर बीम लाइटच्या वापरास प्रतिबंध करणारे आदेशही जारी करण्यात आले आहे.
गस्त, नाकाबंदी अन्ऑ ल-आऊट
शहरात शांतता राखण्यासाठी गुन्हेगार तपासणी, गस्त, नाकाबंदी, कोम्बिंग व ऑल-आऊट ऑपरेशन्स सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व स्तरावर काटेकोर देखरेख ठेवण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.
45 ठिकाणी मूर्ती विसर्जन
या वर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत 2,146 सार्वजनिक गणपती आणि 2,65,274 घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन 45 घाटांवर होणार असून, सातव्या दिवशी 521, नवव्या दिवशी 236, दहाव्या दिवशी 373 आणि अकराव्या दिवशी 959 गणपतींचे विसर्जन होणार आहे.
नागरिकांना आवाहन
या संदर्भात आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांना व गणेशोत्सव मंडळांना सहकार्याचे आवाहन केले आहे. ‘गणेशोत्सव शिस्तबद्ध, शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था भंग करणार्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.