

मनीषा थोरात-पिसाळ
मोशी: पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पडणाऱ्या कडक उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत, मानवी जीवनाला आणि पर्यावरणाला संजीवनी देणाऱ्या वृक्षांचे रक्षण करणे काळाची गरज असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मात्र अगदी याउलट आणि संतापजनक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. झाडांच्या बुंद्याजवळच काँक्रिटीकरण केल्याने जणू काही हे झाडे आयुक्तसाहेब आम्हालाही तुमच्यासाठी जगू द्या, असा आक्रोश करताना दिसून येत आहेत.
पृथ्वीतलावर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. तो झाडांपासून मिळतो. परंतु, महापालिका शहराचा विकास साधताना या झाडांवर अप्रत्येक्षरित्या कुर्ऱ्हाड चालवत तर नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक व पर्यावरणप्रेमी करत आहेत. चिखली-मोशी परिसरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती पालिकेच्या वतीने थेट कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांचे आणि पदपथांचे काम करताना झाडांच्या मुळांना पाणी मुरण्यासाठी अगदी थोडीही जागा न सोडता, संपूर्ण परिसर सिमेंट आणि कॉंक्रीटने बुजवून टाकण्यात आला आहे. महापालिकेच्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आणि बेजबाबदार कामाचा नमुना सध्या या परिसरात पाहायला मिळत आहे.
झाडांच्या आजूबाजूला अशा प्रकारे कॉंक्रिटीकरण केल्यामुळे भविष्यात या वृक्षांना पाणी न मिळाल्याने ती पूर्णतः कोरडी पडून जळून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे स्वतः प्रशासनच या झाडांचा गळा घोटण्याचे काम करत असल्याने स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून तीव संताप व्यक्त होत आहे.
राक्षसी विकासच पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत
महापालिकेच्या व शासनाच्या वतीने ‘झाडे लावा देश जगवा’ असा उपक्रम राबविला जातो. परंतु, प्रत्यक्षात महापालिकेचा विकासच झाडांच्या मुळावर घाव घालत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यायचा, असा प्रश्न नागरिक करत आहेत. मोठमोठ्या झाडांच्या बुंद्याभोवती सिमेंट टाकून पॅक केल्याने पाण्याविना ही झाडे जळून जातील. एक तर सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यात बुंद्याभोवती का ँक्रिटीकरण केल्याने झाडांनी कसे जगायचे, हा प्रश्न आहे. मानवाचा हा राक्षसी विकासच एक दिवस माणसाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरेल, अशी भावना ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
सध्या वातावरणातील तापमान प्रचंड वाढले असून, सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मानवी जीवनाला जीवनदान देणाऱ्या वृक्षांचे जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिका चिखली-मोशी परिसरातील झाडांच्या बाजूला पूर्णतः कॉंक्रिटीकरण करून या निष्पाप वृक्षांचा जीव घेण्याचे काम करत आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, प्रशासनाने तात्काळ हे कॉंक्रीट काढून झाडांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, अन्यथा भविष्यात ही सर्व झाडे नष्ट होतील.
दिगंबर काशीद, स्थानिक